पुढारी ऑनलाईन : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी (Asian Games 2023) पुरुष आणि महिला क्रिकेट संघ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेसाठी शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्याकडे संघाचे नेतृत्व दिले जाणार जाऊ शकते आणि व्हीव्हीएस लक्ष्मण संघाचे प्रशिक्षक असतील, अशी माहिती बीसीसीआयच्या सुत्रांनी दिली आहे. शिखर धवन गेल्या सहा महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान चीनमध्ये होणार आहे.
शिखर धवनकडे भारताच्या ब संघाची कमान सोपवली जाऊ शकते. २०१४ मधील इंचियोन येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत शेवटचे क्रिकेट सामने झाले होते. ९ वर्षांपूर्वी झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघ सहभागी झाले नव्हते. दरम्यान, हांगझोऊ येथील स्पर्धेत पूर्ण ताकदीचा महिला संघ असेल आणि सुवर्ण जिंकण्याच्या उद्देशानेच तो मैदानात उतरेल, असे सुत्रांनी म्हटले आहे.
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून भारतात होणार आहे. यामुळे टीम इंडियाचे प्रमुख खेळाडू या स्पर्धेत व्यस्त राहणार आहेत. यामुळे BCCI ने २०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरूषांचा ब संघ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. महिला क्रिकेटचा मुख्य संघ या स्पर्धेसाठी पाठवला जाईल. आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये आयोजित केली जाते.
शिखर धवनने १० डिसेंबर २०२२ रोजी भारतीय संघासाठी शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर त्याने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पण, इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०१३ मध्ये त्याची दमदार कामगिरी राहिली होती. शिखर धवनने IPL २०२३ मध्ये ११ सामन्यांत ४१.४४ च्या सरासरीने आणि १४२.९१ च्या स्ट्राइक रेटने ३७३ धावा केल्या. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ९९ होती.
शिखर धवन आयपीएलमध्ये सर्वाधिक घावा करणाऱ्यांच्या यादीत विराट कोहली याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने २१७ सामन्यांत ३५.३९ च्या सरासरीने आणि १२७.१८ स्ट्राइक रेटने ६,६१७ धावा केल्या आहेत. या यादीत अव्वल स्थानी असलेल्या विराटच्या नावावर २३७ सामन्यांत ७,२६३ धावांची नोंद आहे.
शिखर धवनने याआधी टीम इंडियाची कमान सांभाळली होती. त्याच्याकडे जून २०२१ मध्ये श्रीलंका विरुद्ध एकदिवसीय आणि टी २० आंतरराष्ट्रीय मालिकेत ब संघाचे नेतृत्व देण्यात आले होते. जुलै २०२२ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध एकदिवसीय मालिकेत त्याने टीम इंडियाचे कमान सांभाळली होती.
शिखर धवनच्या संपूर्ण करिअरवर नजर टाकल्यास त्याने आतापर्यंत ३४ कसोटी, १६७ एकदिवसीय आणि ६८ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने ४०.६१ च्या सरासरीने २,३१५ धावा, ४४.११ च्या सरासरीने ६,७९३ धावा आणि २७.९२ च्या सरासरीने १,७५९ धावा केल्या आहेत. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी उपाहाराआधी शतक ठोकणारा शिखर धवन हा एकमेव भारतीय फलंदाज आहे. जून २०१८ मध्ये अफगाणिस्तान विरुद्ध त्याने ही कामगिरी केली होती.
हे ही वाचा :