मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सन २०१९ साली सरकार स्थापन करण्यासाठी शरद पवार आमच्यासोबत चर्चा करत होते, त्यावेळी ते कोणत्या तपास एजन्सीला घाबरून आमच्यासोबत येण्यास तयार होते, असा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अन्य नेते तपास यंत्रणांना घाबरून भाजपसोबत गेल्याचा दावा शरद पवार यांनी गुरुवारी केला. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला आहे. ते म्हणाले, शरद पवार यांनी २०१९ मध्ये आमच्याशी चर्चा केली होती. ते आमच्यासोबत यायला तयार होते. त्याआधी २०१७ लाही त्यांनी आमच्याशी चर्चा केली होती. कोणत्या एजन्सीला घाबरून त्यांनी ही चर्चा केली होती? तेव्हा पवार कोणत्या एजन्सीला घाबरून आमच्यासोबत येण्यास तयार होते? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला.
शरद पवार यांच्या मान्यतेनेच आम्ही भाजपला पाठिंबा दिला आहे, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. शरद पवार यांच्याशी चर्चा करून आम्ही सह्या करूनच आलो आहोत हेही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता यावर पवारांनी वेगळे बोलण्याची आवश्यकता नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.