जम्मू; पुढारी वृत्तसेवा : पाकिस्तानने जम्मूतील अरेनिया आणि सुचेतगढ सेक्टरमध्ये सलग सात तास गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) दोन जवान आणि पाच नागरिक जखमी झाले आहेत.
बीएसएफच्या एका अधिकार्याच्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय सीमेवरून पाकिस्तानने भारताच्या पाच चौकींवर गोळीबार केला.
पाकिस्तानकडून हातगोळे डागण्यात आले. त्यामुळे घरांचे मोठे नुकसान झाले. दोन्ही बाजूंनी शुक्रवारी पहाटे तीन वाजेपर्यंत गोळीबार सुरू होता. निवासी भागात गोळीबार केल्याने स्थानिक नागरिकांना रात्रभर बंकरमध्ये ठेवण्यात आले आहे. आता गोळीबार थांबला आहे. जखमींना जम्मूच्या गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या दहा दिवसांत पाकिस्तानकडून दुसर्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यापूर्वी 17 ऑक्टोबरला पाकिस्तानकडून अरेनिया सेक्टरमध्ये कोणत्याही कारणाशिवाय गोळीबार केला. यामध्ये बीएसएफचे दोन जवान जखमी झाले होते. काश्मिरातील कुपवाडामध्ये भारतीय सुरक्षा दलाने लष्कर-ए-तोयबाच्या पाच दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर गुरुवारी रात्री पाकिस्तानकडून अरेनिया आणि सुचेतगढ सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला.
घटनास्थळावरून भारतीय सुरक्षा दलाने पाच-एके सीरिजमधील रायफलीशिवाय मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. दुर्गम भाग आणि खराब वातावरणाचा फायदा घेत दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी भारतीय पथकावर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्याला भारतीय सुरक्षा दलाने जोरदार प्रत्युत्तर दिले.