सिताराम लांडगे
लोणी काळभोर : तरुण, किशोरवयीन मुलांच्या टोळ्या तयार करुन वाममार्गाला लावुन गुन्हेगारी करण्याचे फॅड सध्या ग्रामीण भागात जोरात सुरू झाले आहे. अल्पवयीन मुलांसाठी असलेल्या सौम्य कायद्याचा डोकेबाज पणे गैरवापर करून काही महाभागांनी गुन्हेगारी चे बेमालूम जाळे विणले आहे. या अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीकडे ओढून त्यांच्याकडून खून, अपहरणापासून हप्ता वसुली, जमिनीचे ताबे, अवैध धंदे करण्यापर्यंतचे गुन्हे करवून घेण्याचे प्रकार वाढत आहेत. या प्रवृत्ती मुळे सामाजिक शांतता बिघडत असल्याने अशा अल्पवयीन गुन्हेगारांच्या टोळ्या ग्रामीण भागातील जटिल समस्या बनत चालली आहे.
सध्या ग्रामीण भागातील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या किशोरवयीन व तरुण मुलांमध्ये दाढी, मिशा, केस वाढवणे त्यानंतर अनेक मुलांची टोळी तयार करुन परिसरात आपल्या नावाचा दबदबा निर्माण व्हावा याची क्रेझ वाढत चालल्याने याचाच गैरफायदा घेत काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे गुन्हेगार व स्वयंघोषीत युवानेते, काही तथाकथित राजकीय नेते काही प्राण्यांच्या नावाने, देव देवतांच्या नावे, महापुरषांची नावे वापरून 'ग्रुप'तयार करुन या मुलांना संघटीत करुन यांचा वापर गुन्हेगारीसाठी करत आहेत. वादाच्या जमिनीचे ताबे बळजबरीने घेणे, हप्ता वसूल करणे, मटका दारु धंद्यावरुन खंडणी वसूल करणे एवढेच नव्हे तर यामुलांना अवैध धंदे टाकुन देऊन वाम मार्गाला लावणे असे प्रकार सुरु आहेत.
हळूहळू ही तरुणाई गुन्हेगारीचे अनुकरण करुन गंभीर गुन्हे करण्यास सुरुवात करतात. या अल्पवयीन मुलांकडून खुन, हाणामारी, लुटमार, अपहरण हल्ले असे प्रकार वाढु लागले आहेत. यात त्यांचे आयुष्य बरबाद होऊ लागले आहेत. या अल्पवयीन मुलांचे ग्रुप प्रमुख मात्र यांच्या जिवावर पैसे कमवु लागलेत. स्व:ताच्या वाढदिवसाला लाखो रुपयांची उधळपट्टी करु लागले आहेत. तरुणाई मागे असल्याने स्थानिक राजकीय नेते आमदार, खासदार त्यांच्या कार्यक्रमात हजेरी लावत असल्याने पोलिस दलही अशा ग्रुपकडे दुर्लक्ष करु लागल्याने अशा ग्रुप मधील तरुणाईचे मनोबल वाढत चालले आहे.
आजची तरुण पिढी आपोआप गुन्हेगारीकडे वळु लागली आहे. यामुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले असुन सामान्य माणसाला असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. अशा गंभीर प्रकाराकडे स्थानिक पोलिसांनी गांभीर्याने पाहणे गरजेचे असुन गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या अशा ग्रुप प्रमुखांची पाळेमुळे ठेचुन काढणे ही काळाची गरज आहे अन्यथा ग्रामीण भागातील तरुणाई गुन्हेगारीच्या खाईत आपोआप जाणार यात शंका नाही
आजही ग्रामीण भागातील गरीब शेतकरी आपली लाखमोलाची वडीलोपार्जीत जमिन अशा टारगट ग्रुपला भिऊन आपली जमिन जाती का काय अशा भयअवस्थेत असतो तर या टोळक्याची हप्तेखोरी ही मटका जुगारीच्या अड्ड्यांवर जास्त असते कारण यांना लुटले तर पोलिसात तक्रार केली जात नाही म्हणून यांचे मनोबल वाढत चालले आहे
डाॅ. जय जाधव पँटर्न हवा
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात बाहेरील जिल्ह्यातील एक नामांकित ग्रुप प्रमुख येथील गरीब शेतकर्यांच्या जमिनीवर बेकायदा ताबा दादागिरी करून टाकायचा याच्या अनेक तक्रारी तत्कालीन पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव यांच्याकडे आल्या होत्या त्यावेळी त्यांनी त्याला बोलावुन साध्या सोप्या सरळ पोलीसी भाषेत समजावून सांगत जर पुणे जिल्ह्यातील गरीब शेतकर्यांच्या जमिनी लाटल्या तर तुझी खैर नाही असे सांगितले त्यानंतर या समुह प्रमुखाला पळता भुई झाली पोलिस अधीक्षक डाॅ. जय जाधव यांची बदली झाल्यानंतरच त्याने पुणे जिल्ह्यात पुन्हा पाय रोवले.जाधव यांच्या सारखे असे धाडस करणे सध्या गरजेचे आहे