ऑलिम्पिक व राष्ट्रकुलसारख्या स्पर्धांतून विविध पदके जिंकणार्या महिला मल्लांनी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आणि भारतीय क्रीडा विश्वात खळबळ उडाली. यासंदर्भात मेरी कोम समितीने आपला अहवाल सुपूर्द केला; पण तो जाहीर केला गेला नाही. त्यामुळे पुन्हा महिला मल्लांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यांची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयानेही घेतली आहे. काय आहे हे प्रकरण?
भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करत देशाच्या कानाकोपर्यातील 200 हून अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मल्ल जंतर-मंतरवर एकत्र येऊन दिवस-रात्र आंदोलन करत आहेत, ही भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी खर्या अर्थाने एक शोकांतिका! ज्याप्रमाणे आरोप होताहेत, त्याप्रमाणे सुमारे दशकभरापासून बृजभूषण या ना त्या तर्हेने महिला मल्लांचे शोषण करत असतील, तर याहून शरमेचे दुसरे काहीच असू शकत नाही. ज्या मल्लांनी देशाला अगदी ऑलिम्पिकच्या सर्वोच्च व्यासपीठापर्यंत पोहोचत भारताला अव्वल पदके जिंकून दिली, ज्यांच्यामुळे त्या स्तरावर राष्ट्रगीताची धून वाजली, त्याच मल्लांना जंतर-मंतरवर उतरत असे थेट आंदोलन करावे लागते, हा घटनाक्रम हेच सांगतो की, 'दाल मे कुछ काला है. या सारी दाल काली है!' काय आहे हे एकंदरीत सर्व गंभीर प्रकरण, कुठवर पोहोचली आहेत याची पाळेमुळे, याचाच हा धांडोळा!
ऑलिम्पिक व राष्ट्रकुलसारख्या सर्वोच्च क्रीडा व्यासपीठावर विविध पदके जिंकणार्या महिला मल्लांनी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आणि अर्थातच भारतीय क्रीडा विश्वात मोठी खळबळ उडाली. खरं तर 23 जानेवारी रोजीच या सर्व घटनाक्रमाची सुरुवात झाली; पण त्यावेळी भारतीय क्रीडा मंत्रालयाने एमसी मेरी कोम हिच्या नेतृत्वाखाली समिती नेमली आणि झाल्या प्रकाराची शहानिशा करून यावर अहवाल देण्याचे निर्देश दिले. यासाठी चार आठवड्यांचा अवधीदेखील दिला. मेरी कोमच्या समितीने आपला अहवाल या कालावधीत जरूर सुपूर्द केला; पण तो जाहीर केला गेला नाही आणि ही फक्त सारवासारव असल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित सात महिला मल्ल जंतर-मंतरवर उतरल्या आणि त्यांच्या पाठीशी समर्थपणे उभे राहिले साधारणपणे 150 ते 200 राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महिला-पुरुष मल्ल!
चौकशी समितीचा अहवाल जाहीर करावा आणि बृजभूषण यांना अटक करावी, यावर ठाम राहिल्या. बरोबर तीन महिन्यांनी म्हणजे दि. 23 एप्रिलपासून आंदोलन सुरू झाले. ज्यावेळी आशियाई स्पर्धा आणि ऑलिम्पिक क्वालिफायरची तयारी करावी, त्याचवेळी स्वत:वर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी या स्तरावर उतरावे लागावे, यासारखी दुसरी शोकांतिका नाही. पुढे याचे इतके संतप्त पडसाद उमटले की, मल्लांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. अगदी सर्वोच्च न्यायालयानेदेखील मल्लांना अशाप्रकारे आंदोलन करावे लागते, हे गंभीर आहे, असे निरीक्षण नोंदवले.
साक्षी मलिक असेल, विनेश फोगट असेल, बजरंग पुनिया असेल आणि त्यांचे अन्य सर्व सहकारी. या सार्यांची मागणी एकच की, या सर्व गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि बृजभूषण यांना अटक करावी. मध्यंतरी एका सायकलिंग प्रशिक्षकावर लैंगिक शोषणाचा आरोप झाला, त्यावेळी त्या पदाधिकार्याचा करार तडकाफडकी रद्दबातल केला गेला आणि काहीच दिवसांत पोलिसांत त्याप्रकरणी एफआयआर दाखल केला गेला, याचा संदर्भही यावेळी देण्यात आला; पण प्रत्यक्षात दिल्ली पोलिसांत अगदी एफआयआरसाठी देखील टाळाटाळ सुरू होती. आता लैंगिक शोषणाचे आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने त्याची चौकशी करण्यासाठी अधिक वेळ लागेल, असा पवित्रा क्रीडा मंत्रालयाने घेतला; पण एकंदरीतच बृजभूषणसारखी महनीय व्यक्ती यात गुंतली असल्याने चौकशी व कारवाईत टाळाटाळ सुरू असल्याचेच सूर्यप्रकाशाप्रमाणे सुस्पष्ट होत गेले.
टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्यविजेता पुरुष मल्ल बजरंग पुनियाने तर थेट पंतप्रधानांना हस्तक्षेप करण्याबाबत साकडे घातले. तो जाहीरपणे म्हणाला, 'आम्ही पदके जिंकतो, त्यावेळी तुम्ही आमच्या पाठीशी असता. आता आम्ही थेट रस्त्यावर उतरलो आहोत तर तुम्ही शांत आहात.'
दोनवेळची वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगटने ज्या महिला मल्लांनी तक्रार केली, त्यांच्या घरापर्यंत पोहोचत, मारण्याची धमकी दिली जात असल्याचा गंभीर आरोप यावेळी केला. आंदोलन याच क्षणी थांबवावे, यासाठी धमकावणे, पैशांची ऑफर देणे, दडपण आणणे असे प्रकार सुरूच आहेत, असे ती म्हणाली. कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात याची दखल घेतली गेली; पण ज्या 7 महिला मल्लांनी तक्रार नोंदवली, त्यांची नावे कुस्ती महासंघ अध्यक्षांकडे लीक करण्यात आली. अर्थात, सोयीस्करपणे पोहोचवली गेली, हे सर्वात दुर्दैवी आहे, असा आरोप विनेशने येथे केला.
2012 पासून 2022 पर्यंत बृजभूषण यांनी महिला मल्लांचे आपल्या दिल्लीतील बंगल्यात आणि त्याचप्रमाणे देश-विदेशात विविध स्पर्धांच्या ठिकाणी लैंगिक शोषण केले, असा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. तूर्तास, बृजभूषण यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच वैयक्तिक हेव्यादाव्यातून आपल्याला एक गट त्रास देत असल्याचा दावा केला आहे.
कोण आहेत बृजभूषण सिंह?
66 वर्षीय बृजभूषण सिंह हे 1991 पासून 6 वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. यापैकी 5 वेळा त्यांनी भाजपच्या तिकिटावर बाजी मारली. उत्तर प्रदेशमधील कैसरगंज हा त्यांचा मतदारसंघ. राम जन्मभूमी चळवळीत त्यांचा समावेश राहिला आणि 2019 मध्ये निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या माहितीनुसार, बाबरी मशीदप्रकरणी त्यांच्यावर दोषारोप होते. प्रदीर्घ कालावधीपासून ते भारतीय कुस्ती संघाच्या अध्यक्षपदी विराजमान आहेत आणि या सर्व प्रभावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय कुस्तीत त्यांचा शब्दच अंतिम असायचा!
दि. 7 मे रोजी नव्याने होणार्या निवडणुकीसाठीही ते गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच होते; पण यापूर्वीच चार वर्षांच्या 3 टर्म पूर्ण केल्या असल्याने यंदा ते ही निवडणूक लढ
विवेक कुलकर्णी