Latest

सातारा : ‘अजिंक्यतारा’ भोवती दरड संरक्षक भिंत

दिनेश चोरगे

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा शहराच्या उत्तर-पूर्व बाजूस असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याच्या उतारावर हजारोंची लोकवस्ती आहे. डोंगरावरून येणार्‍या दरडींचा या नागरी वस्तीला धोका आहे. त्यामुळे सातारा पालिकेने सर्व्हे करून संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या कामाचा सुमारे 35 कोटींचा आराखडा राज्य शासनास सादर करण्यात आला आहे.

सातारा नगरपालिका हद्दवाढ झाल्यानंतर नागरीकरणाचा वेग वाढला आहे. मूलभूत सुविधा उपलब्ध होत असल्याने शहराचा पूर्व, पश्चिम आणि उत्तर दिशेला विस्तार होत आहे. मात्र शहराच्या दक्षिणेस असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला दाट लोकवस्ती आहे. अनेक घरे डोंगराच्या पायथ्यापासून बरीच वर आहेत. या डोंगराळ भागात मूलभूत सुविधा देताना अडचणी येत असल्या तरी आणि येथे सुविधा फार मिळत नसल्या तरीही या भागात दिवसेंदिवस नागरी वस्ती वाढताना दिसत आहे.

सातारा शहर अजिंक्यतारा किल्ल्याच्या उत्तर-पूर्व बाजूच्या उतारावर वसलेले आहे. सध्या बदलणार्‍या पर्जन्यमानामुळे डोंगर उतारावर राहणार्‍या लोकवस्तीला दरड कोसळण्याचा धोका असल्याने सातारा पालिकेने संरक्षक भिंत बांधण्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला आहे. यामध्ये सुमारे 2.5 कि.मी. क्षेत्रात विविध उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत.

या भागाला महाकाय दरडींचा धोका

अजिंक्यतारा किल्ल्यावरून सुटलेल्या महाकाय दरडी डोंगराच्या निम्म्या भागापर्यंत येऊन थांबल्या आहेत. काही भागात या दरडी अत्यंत धोकादायक अवस्थेत आढळून आल्या आहेत. काही दरडी किल्ल्यावरून निसटण्याची शक्यता आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी प्रामुख्याने माची पेठेचा भाग आहे. त्याशिवाय कोल्हाटी वस्ती, केसरकर पेठ ते बोगदा परिसरातील नागरी वस्तीला दरडींचा धोका आहे.

सातारा पालिकेचा काय आहे आराखडा?

संरक्षक भिंतीची उभारणी करण्यात येणार आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी गटर तसेच किल्ल्यावरून शहराकडे येणार्‍या ओढ्यांचे अस्तरीकरण करण्यात येणार आहे. या कामाचा निधी मागणीसाठीचा प्रस्ताव आपत्ती सौम्यकरण प्रस्तावांतर्गत शासनास मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.

SCROLL FOR NEXT