क्रिकेट हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय क्रीडा प्रकार बनला त्यालाही आता बराच काळ उलटला आहे. दोन दशकांपूर्वी क्रिकेटबाबतचे प्रेम गल्लीबोळांमध्ये, गावातील मैदानावर क्रिकेट खेळणार्या मुलांच्या माध्यमातून आणि टी.व्ही.च्या पडद्यावर क्रिकेटचे सामने पाहण्यातून दिसत होते; पण कसोटी, एकदिवसीय सामने, रणजी, आंतरराष्ट्रीय सामने यामध्ये झळकण्याचे स्वप्न उराशी बाळगणार्यांची संख्या आजच्याइतकी नव्हती. परंतु, आयपीएलचा उदय झाला आणि देशाच्या कानाकोपर्यातील अनेक क्रिकेटपटू राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकू लागले. या प्रसिद्धीबरोबरच प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैसाही खेळाडूंना मिळू लागला. अर्थातच, यामुळे स्पर्धा प्रचंड वाढीस लागली. कसलेल्या आणि खरोखरीच कसब असणार्या खेळाडूंनाच संधी दिली जात असल्याने क्रिकेटमधील गुणवत्ता वाढली. सर्फराज खान हा अशी गुणवत्ता असणार्या खेळाडूंमधील तडाखेबंद आणि धडाकेबाज फलंदाज. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे रनमशिन म्हणून ओळखल्या जाणार्या सर्फराजला अलीकडेच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. सर्फराजच्या आजवरच्या संघर्षमय कारकिर्दीला एक नवा आयाम या निवडीमुळे मिळणार आहे.
वास्तविक, विराट कोहलीने या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्फराज आणि रजत पाटीदार यांची नावे त्याला पर्याय म्हणून सर्वात आधी समोर आली; पण निवडकर्त्यांनी पाटीदारची निवड केली. यानंतर भारत 'अ' संघाकडून इंग्लंड लायन्सविरुद्ध सर्फराजने शतकी खेळी करत 161 धावा केल्या आणि निवड समितीसमोर पुन्हा एकदा आपला दावा मांडला. आता के. एल. राहुलच्या दुखापतीमुळे त्याला संघात स्थान मिळाले आहे.
सर्फराज गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई संघासाठी अप्रतिम कामगिरी करत आहे. रणजी ट्रॉफीमध्ये त्याच्या नावावर तिहेरी शतक नोंदवलेले आहे. 300 धावांची वैयक्तिक धावसंख्या मैदानावर उभी करणे ही बाब अत्यंत कठीण आहे; पण आपल्या तळपत्या बॅटने सर्फराज अक्षरशः गोलंदाजांवर तुटून पडतो आणि मोठी धावसंख्या उभी करतो. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 45 सामन्यांत 66 डावांमध्ये 3,912 धावा केल्या आहेत. यामध्ये 14 शतके आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. या काळात त्याची सरासरी 69.85 आहे. सर्फराज खानने फलंदाजी करताना सातत्यपूर्ण दमदार कामगिरी सुरूच ठेवली आहे, हे विशेषत्वाने लक्षात घ्यायला हवे. याशिवाय लिस्ट 'ए'मध्ये 37 सामन्यांत त्याच्या नावावर 629 धावा आहेत.
एकेकाळी आपल्या तंदुरुस्तीमुळे टीकेला सामोरे जाणार्या सर्फराज खानने बॅटने आपली दमदार कामगिरी सुरू ठेवताना कधीही हार मानली नाही. 2022-23 च्या हंगामात सर्फराजने सहा सामन्यांमध्ये 92.66 च्या सरासरीने 556 धावा केल्या आहेत. यामध्ये तीन शतकांचाही समावेश आहे. 2021-22 हंगामातील सहा सामन्यांमध्ये त्याने 122.75 च्या सरासरीने 982 धावा केल्या असून, त्यामध्ये चार शतकांचा समावेश आहे. 2019-20 हंगामात मुंबईसाठी सहा सामन्यांत 154.66 च्या प्रभावी सरासरीने सर्फराजने 928 धावा केल्या. यामध्येही तीन शतकांचा समावेश होता. तीन देशांतर्गत हंगामात त्याच्या नावावर 2,466 धावा नोंदवल्या गेलेल्या असून, हा एक मोठा विक्रम आहे. त्याच्याशिवाय गेल्या तीन मोसमांत अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज नाही.
आज कसोटी संघात स्थान मिळाल्यामुळे सर्फराजची चर्चा होत असली, तरी तो खर्या अर्थाने प्रसिद्धीस पावला 2009 मध्ये. यावर्षी सचिन तेंडुलकरचा हॅरिस शिल्डचा विक्रम मोडून त्याने 421 चेंडूंत 439 धावा करून देशातीलच नव्हे, तर जगभरातील क्रिकेट रसिकांना अचंबित केले होते. त्यावेळी त्याचे वय होते केवळ 12 वर्षे आणि हा त्याचा पहिलावहिला हॅरिस शिल्ड गेम होता. या खेळीत 56 चौकार आणि 12 षटकारांचा समावेश होता. यानंतर तो लवकरच मुंबई अंडर-19 संघासाठी खेळू लागला आणि त्याच्या कामगिरीमुळे त्याची भारतीय अंडर-19 संघात निवड झाली. 2013 मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेच्या अंडर-19 विरुद्ध 66 चेंडूंत 101 धावांची सामना जिंकणारी खेळी खेळली, ज्यामध्ये 17 चौकार आणि एक षटकार समाविष्ट होता. भारताच्या अंडर-19 संघाचे तत्कालीन मुख्य प्रशिक्षक भरत अरुण यांनी त्यावेळी टिपणी केली होती की, 'तो एक धाडसी खेळाडू आहे, परिस्थिती चांगल्या प्रकारे समजून घेतो. त्याने विकेटभोवती शॉटस् मारले आहेत आणि सरळ खेळताना तो आणखी चांगला दिसतो. तो पायाचा चांगला वापर करतो. चिकी स्ट्रोक मारण्यात तो माहिर आहे.'
सर्फराज भारताकडून दोन अंडर-19 विश्वचषक (2014 आणि 2016) खेळला. 2014 अंडर-19 विश्वचषक राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये भारत 5 व्या स्थानावर होता. या स्पर्धेतील सहा सामन्यांत 70.33 च्या सरासरीने त्याने 211 धावा केल्या होत्या. दोन डावांत अर्धशतके होते आणि त्याचा स्ट्राईक रेट 105.5 होता. बांगला देशमध्ये 2016 च्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भारत उपविजेता ठरला. सर्फराज या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू होता. त्याने सहा डावांत 50 पेक्षा जास्त स्कोअरसह 71 च्या सरासरीने 355 धावा केल्या होत्या. अंडर-19 स्तरावर, विश्वचषकात सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम (दोन विश्वचषकांमध्ये 7 अर्धशतके) त्याच्या नावावर आहे.
या कामगिरीनंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने त्याला 2015 च्या आयपीएल हंगामासाठी पन्नास लाखांची बोली लावून विकत घेतले. वयाच्या 17 व्या वर्षी आयपीएल सामन्यात दिसणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला. 2016 च्या आयपीएलमधला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना सर्फराजसह सर्वांच्याच स्मरणात राहणारा ठरला. हैदराबादच्या भुवनेश्वर कुमारसमोर आरसीबीच्या भल्याभल्या फलंदाजांचा निभाव लागत नव्हता. त्याकाळी भुवी जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक होता. त्याच्या स्विंगसमोर दिग्गजांची दाणादाण उडायची. चौकार-षटकार सोडा, विकेट वाचवणं अवघड जायचं; पण त्या सामन्यात एका नव्या दमाच्या सर्फराजने भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला. तो जेव्हा पॅव्हेलियनमध्ये परतला, तेव्हा त्याचे संघ सहकारी विराट कोहली, ख्रिस गेल त्याचं कौतुक करायला रांगेत उभे होते. त्याच्या खेळीला दाद म्हणून सगळेच उभे राहिले होते. उंचीनं थोडा कमी असलेल्या सर्फराज खानच्या धुवांदार खेळीची त्यावेळी खूप चर्चा झाली.
भारताच्या डोमेस्टिक क्रिकेटचा डॉन ब्रॅडमन समजल्या जाणार्या सर्फराज खाननं 2016 च्या आयपीएलमध्ये हैदराबादविरुद्ध 10 चेंडूंमध्ये नाबाद 35 धावांची वादळी खेळी साकारली होती.
सर्फराजने 2014 मध्ये बंगालविरुद्ध खेळताना मुंबईकडून रणजी कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याने 2015-16 हंगामापासून उत्तर प्रदेशकडून खेळण्यास सुरुवात केली. सप्टेंबर 2019 पर्यंत त्याने 11 प्रथम श्रेणी सामने खेळले होते आणि 155 च्या सर्वोच्च स्कोअरसह 535 धावा केल्या होत्या. त्याने 12 लिस्ट 'ए' सामनेदेखील खेळले आणि 96.25 च्या स्ट्राईक रेटने 257 धावा केल्या. 3 जानेवारी 2020 मध्ये, उत्तर प्रदेशविरुद्ध 2019-20 रणजी ट्रॉफी सामन्यात, सर्फराजने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पहिले त्रिशतक झळकावले.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या 2022 हंगामात सर्फराजने अधूनमधून यष्टिरक्षक म्हणून नवीन अवतार धारण करण्यास सुरुवात केली. त्याच्या ज्युनिअर खेळाच्या दिवसात यष्टिरक्षण काही नवे नसले, तरी वरिष्ठ क्रिकेटमध्ये त्याची ही पहिलीच वेळ होती.
ताज्या निवडीनंतर पाच दिवसांच्या कसोटी सामन्यांमध्ये सर्फराजची बॅट तळपणार आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत सर्फराजकडून नवा विक्रम प्रस्थापित व्हावा, हीच त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे.