विटा; पुढारी वृत्तसेवा : माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी आज (दि. २) आज आमदार गोपीचंद पडळकर यांना भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. खानापूर मतदारसंघाचा २०२४ चा विधानसभेचा एकच छंद गोपीचंद एवढेच आपण लक्षात ठेवून दसऱ्यानंतर कामाला लागायचे आहे, असे आवाहन देखील देशमुख यांनी केले. कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना त्यांनी केलेल्या या आवाहनामुळे राजकीय अभ्यासकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भाजपचे फायर ब्रँड नेते आणि विधान परिषदेचे सदस्य आमदार गोपीचंद पडळकर यांचा वाढदिवस रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संपूर्ण खानापूर मतदारसंघांमध्ये यानिमित्त विविध उपक्रम आणि आमदार पडळकर यांना शुभेच्छा देण्याचे कार्यक्रम पार पडले. यामध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो रविवारी रात्री उशिरा करगणी (ता. आटपाडी) येथे झालेल्या आमदार पडळकर यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचा. रात्री साडेदहा नंतर झालेल्या या जाहीर कार्यक्रमात माजी आमदार आणि भाजप नेते राजेंद्र देशमुख यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना खानापूर मतदारसंघाचा २०२४ चा विधानसभेचा एकच छंद, अशी घोषणा दिली. त्यावर उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांनी 'गोपीचंद' अशी गर्जना केली. तसेच एवढेच बोलून न थांबता माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी, आपण एवढेच लक्षात ठेवून दसऱ्यानंतर पूर्ण तालुक्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये कामाला लागायचे आहे, असे आवाहन देखील केले. त्यामुळे करगणी (ता. आटपाडी) येथे झालेल्या कार्यक्रमातील देशमुख यांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे.
माजी आमदार राजेंद्र देशमुख यांचे धाकटे बंधू अमरसिंह देशमुख हे भाजपचे मतदार संघाचे अध्यक्ष आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून ते शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिलराव बाबर यांच्याबरोबर विविध कार्यक्रमात एकत्र दिसत आहेत. आगामी २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीकडून आमदार बाबर यांची दावेदारी प्रबळ असताना आटपाडीच्या मातब्बर भाजप नेत्याने आमदार गोपीचंद पडळकर यांची उमेदवारीच एक प्रकारे जाहीर केली आहे. त्यामुळे महायुती अंतर्गत नेमके काय चालले आहे? असा प्रश्न सर्वसामान्य पडला असतानाच ही महायुतीतील धुसफूस आहे का? आगामी बदलत्या काही राजकारणाच्या वेगळ्या समीकरणाची नांदी तर नव्हे ना? याची चर्चा संपूर्ण खानापूर मतदार संघात रंगली आहे.