Latest

टप्प्यात आला की करेक्ट कार्यक्रम; रोहित शर्माने सांगितला टीम इंडियाचा ‘गेम प्लॅन’

Arun Patil

लंडन, वृत्तसंस्था : लंडनमधील ओव्हल मैदानावर 7 जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाचा कठोर परिश्रम करणे आणि योग्य वेळी गोलंदाजांवर हल्ला करणे हा एकच प्लान असल्याचे भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने सांगितले.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी ब्रॉडकास्टरने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात, भारतीय कर्णधार म्हणाला की, ओव्हलमध्ये फलंदाजीची सर्वोत्तम परिस्थिती आहे. हवामान सतत बदलत असते, त्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ लक्ष केंद्रित करावे लागेल आणि तेच या फॉरमॅटचे आव्हान आहे आणि त्यासाठी तुम्हाला तयार राहावे लागेल.

'आफ्टरनून विथ टेस्ट लिजेंडस्' या आयसीसी शोमध्ये रोहित म्हणाला, तुमची ताकद काय आहे, हे तुम्हाला समजले पाहिजे. येथे धावा काढण्याची पद्धत जाणून घेणे चांगले आहे. कारण आम्हाला माहीत आहे की, ही इंग्लंडमधील फलंदाजीसाठी सर्वोत्तम विकेटस्पैकी एक आहे. आऊटफिल्ड खूप वेगवान आहेत. सत्राचे नियंत्रक हर्षा भोगले यांनी भारतीय कर्णधाराला सर्वसाधारणपणे कसोटी क्रिकेटचे मूल्यांकन कसे केले, असे विचारले. यावर रोहित म्हणाला की, ते आमच्यासाठी सर्वात टॉपवर आहे.

रोहित शर्मा म्हणाला की, हा सर्वात आव्हानात्मक फॉरमॅट आहे. हे तुम्हाला एक खेळाडू आणि एक लीडर म्हणून आव्हान देते. आमच्या टीमसाठीही तुम्हाला माहीत आहे की गेल्या तीन-चार वर्षांत आम्हाला जगभरात चांगले यश मिळाले आहे. मला वाटते की इंग्लंडमध्ये फलंदाजांसाठी खूप आव्हानात्मक परिस्थिती असते. जोपर्यंत तुम्ही आव्हानांना सामोरे जाण्यास तयार असाल, तोपर्यंत तुम्हाला यश मिळते.

SCROLL FOR NEXT