मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील नागरी सहकारी बँकांसमोरील अडचणीचा अभ्यास करून शासनास अहवाल सादर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती नेमली होती. या समितीचा अहवाल आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे भाजपचे विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्याहस्ते सुपूर्द करण्यात आला.
शहरातील कमी उत्पन्न गटातील नागरिक, लहान व्यापारी आणि लघू उद्योजक यांना नागरी सहकारी बँका बँकिंगच्या सोईसुविधा उपलब्ध करून देतात. परंतु सध्या राज्यातील अनेक नागरी सहकारी बँका अडचणीत आहेत. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी समिती स्थापन करावी, असे आदेश सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. या समितीची आमदार प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत नुकतीच पुणे येथे बैठक पार पडली होती. राज्यातील महायुती सरकार नागरी सहकारी बँकांची चळवळ वाचविण्यासाठी तरतूद करून मदत करेल, अशी अपेक्षा दरेकरांनी व्यक्त केली होती. त्यानुसार आज समितीचा अहवाल शासनास सुपूर्द केला गेला. यावेळी सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, आमदार प्रसाद लाड, मुंबई बँकेचे संचालक नितीन बनकर उपस्थित होते.