राज्यात गेल्या काही वर्षांत गावरान लसणाच्या लागवडीत घट झाली आहे. राज्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांत परराज्यांतून लसूण येतो. त्यामुळे लसूण महागला आहे. परिणामी, गृहिणींचे अंदाजपत्रक तीन महिन्यांपासून बिघडलेले आहे. लसणाला उच्चांकी दर मिळताना दिसतो. या पार्श्वभूमीवर लसणाच्या बाजारपेठेचा घेतलेला आढावा… (Garlic Price)
मध्य प्रदेश, गुजरातमधील लसूण उत्पादकांची देशात मक्तेदारी वाढली असून नगदी पीक व बारमाही मागणीमुळे मध्य प्रदेश, गुजरातमध्ये लागवडीस प्राधान्य दिले जाते. (Garlic Price)
कांदा लागवडीतून चांगली रक्कम मिळत असल्याने शेतकरी लसूण लागवड कमी करत गेले; पण आजघडीला कांदाच शेतकऱ्यांना रडवत असल्याचे चित्र आहे. पुणे, नगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर भागांत लसणाची लागवड वाढली होती. या जिल्ह्यांच्या बाजार समित्यांत लसणाची आवक मोठ्या प्रमाणावर होती; पण नंतरच्या काळात लसणाऐवजी कांदा लागवड वाढून लसणाची आवक घटली. परिणामी, गुजरात, मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी लसूण महाराष्ट्रात आणायला सुरुवात केली.
खराब हवामानामुळे अनेक राज्यांत लसूण पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. लसणाच्या भावात वाढ होण्यामागे हेही प्रमुख कारण आहे. पिकाचे नुकसान झाल्यामुळे दुसऱ्या पिकाची लागवड करण्यास वेळ लागला. त्यामुळे नवीन लसूण पिकाची आवक होण्यास विलंब होत आहे. मध्य प्रदेशात लसणाची सर्वाधिक लागवड केली जाते. लसणाचे पीक बाजारात येताच लसणाचे भाव उतरतील, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.