पुढारी ऑनलाईन डेस्क : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ( आरबीआय) आज रेपो दरात ०.५० टक्के वाढ केली. या निर्णयामुळे आता रेपो रेट हा ४.४० वरुन ४.९० झाला आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या घोषणेमुळे महिन्याभराच्या आतच दुसर्यांदा कर्जदारांना झटका बसला आहे.
वाढत्या महागाईवर आळा घालण्यासाठी मे महिन्यामध्ये आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दरात वाढ ०.४० टक्के वाढ केली होती. २०२० मध्ये रेपो दर हा ऐतिहासिक निच्चांकी पातळीवर होता. यानंतर तो ४, ४० टक्के वाढ झाली. याचवेळी जून महिन्यात पुन्हा रेपो दरात वाढ होईल, असे संकेत दास यांनी दिले होते.
यावेळी शक्तिकांत दास यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वितरण व्यवस्थेवर परिणाम झाल्याने
देशातील महागाई सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआयला कडक पावले उचलावी लागणार आहेत. रशिया-युक्रेन युद्धामुळे देशातंर्गत महागाईत वाढ झाली आहे. तरीही देशाची अर्थव्यवस्थेची सकारात्मक दिशेने वाटचाल सुरु आहे, सध्याच्या परिस्थिती रेपो दरात वाढ करणे आवश्यकच होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देशातील घाऊक महागाई दरात मागील आठ वर्षांमधील सर्वाधिक वाढ होत हा दर ७.७० टक्क्यांवर पोहचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या वाढीचा मोठा फटका बसत आहे.
आरबीआयने रेपो दरात वाढ केल्याचा फटका कर्जदारांना बसतो कारण रेपो दरात झालेली वाढीमुळे गृह, वाहन आणि व्यक्तिगत कर्ज महाग होते. तसेच कर्जदारांच्या मासिक हप्त्यांमध्ये वाढ होते. कर्जदाच्या ईएमआयमध्ये वाढ होणार असल्याने वाढत्या महागाईत आता कर्जाचे हप्ते वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांची आणखी कुंचबणा होणार आहे.
हेही वाचा :