नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : संसद अधिवेशनाच्या काळात वारंवार वेलमध्ये येऊन गदारोळ, घोषणाबाजी करणाऱ्या तसेच कामकाजात बाधा आणणाऱ्या १२ खासदारांच्या वर्तनाची तपासणी करण्याचे निर्देश राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी संसदीय समितीला दिले आहेत.
१२ खासदारांमध्ये ९ खासदार काँग्रेसचे आहेत तर ३ खासदार आम आदमी पक्षाचे आहेत. या खासदारांनी हक्कभंग केला आहे काय? याची तपासणी संसदीय समिती करणार आहे. काँग्रेसच्या ज्या खासदारांच्या वर्तनाची तपासणी होईल, त्यात काँग्रेसचे शक्तीसिंग गोहेल, नरनभाई राठवा, सय्यद नासिर हुसेन, कुमार केतकर, इम्रान प्रतापगढी, एल. हनुमंतय्या, फुलोदेवी नेताम, जेबी माथूर हिसम आणि रंजित रंजन यांचा समावेश आहे. याशिवाय आम आदमी पक्षाच्या संजय सिंग, सुशीलकुमार गुप्ता आणि संदीप पाठक यांच्या वर्तनाचीही तपासणी होणार आहे.