येत्या लोकसभा निवडणुकीत (Rajasthan LS Election) राजस्थानमध्ये सत्तारूढ भाजप आणि विरोधी काँग्रेस यांच्यातच पुन्हा एकदा जोरदार टक्कर होणार, हे स्पष्ट झाले आहे. दोन्ही पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली असून, वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. सध्याच्या स्थितीत मतदारांशी वैयक्तिक संपर्क साधण्यावर बहुतांश उमेदवारांचा जोर दिसत आहे. (Rajasthan LS Election)
राजस्थानमध्ये आलटून-पालटून भाजप आणि काँग्रेस हे दोनच पक्ष विधानसभेत सत्तेवर येतात. लोकसभेचे Rajasthan LS Election) गणित अर्थातच वेगळे असते. लोकसभेला मतदार प्रामुख्याने राष्ट्रीय प्रश्नांना महत्त्व देतात. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारली आणि काँग्रेसचा सफाया झाला. या पार्श्वभूमीवर, येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा एकदा 2019 सारख्या कामगिरीची अपेक्षा आहे. दुसरीकडे, काँग्रेसनेही जोर लावला आहे. त्यामुळे लोकसभेला या दोन्ही पक्षांत तगडा मुकाबला अपेक्षित आहे. या राज्यात लोकसभेच्या एकूण 25 जागा असून, एप्रिल महिन्यात 19 आणि 25 रोजी दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात श्रीगंगानगर, बिकानेर, चुरू, सीकर, झुंझुनू, जयपूर, जयपूर ग्रामीण, दौसा, अलवर, भरतपूर, करौली-धौलपूर, टोंक- सवाई माधोपूर या ठिकाणी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दुसर्या टप्प्यात नागोर, अजमेर, पाली, जोधपूर, बाड़मेर, जालोर, उदयपूर, चितोड, राजसमंद, भिलवाडा, कोटा-बुंदी, झालावाड-बारा, बाँसवाडा या ठिकाणी मतदान होणार आहे. (Rajasthan LS Election)
केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांची (Rajasthan LS Election) घोषणा केल्यानंतर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे विविध नेत्यांनी लावलेले प्रचार फलक आणि होर्डिंग्ज हटविण्याचे काम सुरू झाले आहे. आचारसंहितेमुळे शासकीय बदल्या आणि नवे लोकप्रिय निर्णय घेण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत.
पहिल्या टप्प्यात एकूण बारा मतदार संघात निवडणूक होणार असल्यामुळे त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी भाजप लागोपाठ तिसर्यांदा क्लीन स्वीपच्या प्रतीक्षेत आहे. दुसरीकडे, काँग्रेसने यावेळी भाजपपुढे कडवे आव्हान उभे करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ चालविल्याचे दिसून येते. त्या दृष्टीने काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी रणनीती आखण्यासाठी बैठकांवर जोर दिला आहे. या राज्यात मतदारांची एकूण संख्या पाच कोटी, बत्तीस लाख आहे. कोणतीही व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा कामाला लागली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राजस्थानात 67 टक्के मतदान झाले होते. यंदा जवळपास 52 टक्के मतदार 18 ते 39 वयोगटातील आहेत. शिवाय सोळा लाख नवमतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या नवमतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी भाजप आणि काँग्रेसने आघाडी उघडली आहे. लोकसभा निवडणुकांबरोबरच बाँसवाडा की बागीदौरा या दोन विधानसभा मतदार संघांतही पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. त्यामुळे तेथील मतदारांना लोकसभेप्रमाणेच विधानसभेसाठीही मतदान करावे लागेल. (Rajasthan LS Election)
राजस्थानात निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही मुख्य पक्ष कामाला लागले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसचा सुपडासाफ करून भाजप सत्तेवर आला आणि मुख्यमंत्रिपदाची सूत्रे भजनलाल शर्मा यांच्याकडे सोपविण्यात आली. आता त्यांच्या खांद्यावर पक्षाला विजयी करण्याची मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी आणि मुख्यमंत्री शर्मा अशा दोघांनी सारे राज्य पिंजून काढण्यावर विशेष जोर दिला आहे. 2019 मध्ये भाजपने लोकसभा निवडणुकीत 57.48 टक्के मतांसह सर्व 25 जागांवर दणदणीत विजय मिळवला होता. यावेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू चालेल, असा विश्वास भाजपच्या गोटातून व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे काँग्रेसची रणनीती अशोक गेहलोत निश्चित करत असून, युवा नेते सचिन पायलट हेही कामाला लागले आहेत.
हेही वाचा :