पुढारी ऑनलाईन: पुणे जिल्ह्यातील घाट क्षेत्राला आजपासून ( दि. २५ ) पुढील दोन दिवस 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. दरम्यान २५,२६,२७ जुलै रोजी पुणे जिल्ह्यात अतिमुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची अधिक शक्यता आहे, असे हवामान खात्याकडून दिलेल्या बुलेटिनमध्ये सांगण्यात आले आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा (घाट क्षेत्र) या जिल्ह्यांना आज (दि.२५ जुलै), तर रायगड, रत्नागिरी, पुणे (घाट क्षेत्र), सातारा (घाट क्षेत्र) या जिल्ह्यांना उद्या (दि.२६ जुलै) 'रेड अलर्ट' असून, अतिवृष्टीची अधिक शक्यता (Rain News Updates) असल्याचे मुंबई हवामान प्रादेशिक केंद्राने सांगितले आहे.
नैऋत्य मान्सून सध्या कोकण-गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि सौराष्ट्र आणि कच्छवर सक्रिय आहे. सक्रीय मान्सूनच्या स्थितीमुळे या भागातील वाऱ्याचा वेग 45-55 किमी ते 65 किमी प्रतितासपर्यंत पोहचू शकतो, दरम्यान या भागात काही ठिकाणी गडगडाटी वादळासह पावसाची शक्यता (Rain News Updates) आहे, असे देखील हवामान खात्याने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
आज (२५ जुलै) प्रामुख्याने दक्षिण कोकण क्षेत्र, कर्नाटक किनारपट्टीसाठी रेड अलर्ट चेतावणी देण्यात आली आहे. तेलंगणामध्ये गेल्या 24 तासात निजामाबादमध्ये 400 मिमी पावसासह सर्वाधिक पाऊस झाला आहे. तर पुढील दोन दिवसांसाठी दक्षिण कोकणासह मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांना रेड अलर्ट (Rain News Updates) आहे, अशी माहिती आज IMD दिल्लीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आरके जेनामानी यांनी दिली आहे, असे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.