कोल्हापूर; अनिल देशमुख : रेल्वे अर्थसंकल्पात कोल्हापूरच्या तोंडाला पुन्हा एकदा पानेच पुसल्याचे स्पष्ट झाले. मंजुरी मिळालेल्या कोल्हापूर-वैभववाडी आणि हातकणंगले-इचलकरंजी या नव्या मार्गांसाठी केवळ प्रत्येकी एक हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या अर्थसंकल्पात मध्य रेल्वेला 7 हजार 251 कोटी निधी उपलब्ध झाला आहे. तो गेल्यावर्षीपेक्षा 50 टक्के जादा आहे. यामुळे यावर्षी मध्य रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकापैकी एक असलेल्या कोल्हापूरचा वाट्याला काही तरी भरीव तरतूद होण्याची अपेक्षा होती, ती फोल ठरली.
निधी वितरणामध्ये कोल्हापूर-वैभववाडी मार्गासाठी टोकन म्हणून केवळ एक हजार रुपयांची तरतूद केली. तसाच प्रकार हातकणंगले- इचलकरंजी या नव्या मार्गासाठी आहे. कोल्हापूर-मिरज मार्गावरील कोल्हापूर-इचलकरंजी रस्त्यावर उभारण्यात येणार्या उड्डाणपुलासाठी केवळ 4 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
कोल्हापूरची चेष्टाच
कोल्हापूर-वैभववाडी आणि हातकणंगले-इचलकरंजी मार्गाची फेबु्रवारी 2016 मध्ये घोषणा करण्यात आली होती. 2016-17 साली तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोल्हापूर-वैभववाडी मार्गासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद केली होती. यानंतर मात्र या मार्गासाठी भरीव तरतूद झालीच नाही. याउलट दरवर्षी टोकन तरतूद करून रेल्वेकडून कोल्हापूरची एक प्रकारची चेष्टाच सुरू आहे.