Latest

रायगड-पुणे रस्त्यावर मुरूम टाकून वरंधा घाट बंद; प्रशासनाकडून आदेश

अमृता चौगुले

भोर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : कोकणात अतिवृष्टीचा इशारा असल्यामुळे वरंधा घाटातील रायगड-पुणे रस्त्याच्या हद्दीवर मुरूम टाकून लहान-मोठ्या वाहनांसाठी हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आल्याचे आदेश रायगड प्रशासनाने दिले आहेत. हवामान खात्याकडून रेड आणि ऑरेंज अलर्ट असताना पुण्याहून भोरमार्गे कोकणात जाणारा वरंधा घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद असल्याचा आदेश काढूनही वाहनचालक घाटातून प्रवास करीत होते.

त्यामुळे अखेर रायगड प्रशासनाने वरंधा घाटात पुणे आणि रायगड जिल्ह्याची हद्द असणार्‍या ठिकाणी मुरूम मातीचे ढिगारे लावून रस्ता वाहतुकीसाठी शुक्रवारी (दि. 21) रात्री बंद केला. दि. 22 जुलै ते 30 सप्टेंबर दरम्यान अवजड वाहतुकीकरिता हा घाट पूर्णपणे बंद राहणार आहे तर हवामान खात्याचा रेड आणि ऑरेंज अलर्ट असताना हलक्या वाहनांसह घाटातील सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे.

पावसाळ्यात घाटामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेकवेळा अचानक दरडी कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा स्वरूपाच्या घटना घडतात. त्या पार्श्वभूमीवर संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाकडून सूचना येईपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT