पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना मोदी आडनावावरून केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुरत जिल्हा न्यायालयाने हा निर्णय दिला. यानंतर राहुल गांधी यांनीआपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ट्विट करत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये महात्मा गांधी यांचे एक वाक्य शेअर केलं आहे. त्यांचा आशय असा आहे की,"माझा धर्म सत्य आणि अहिंसेवर आधारित आहे. सत्य माझा देव आहे, अहिंसा ते मिळवण्याचे साधन आहे-महात्मा गांधी". (Rahul Gandhi tweet )
मानहानी प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा
राहुल गांधी यांना सुरत जिल्हा न्यायालयाने मोदी आडनावावरून केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल दाखल झालेल्या गुन्ह्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणी त्यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचुकल्यावर जामीन मंजूर झाला असल्याची माहिती राहुल गांधी यांच्या वकिलांनी दिली.
आवाज दाबण्याचा प्रयत्न -प्रियांका गांधी
घाबरलेल्या सत्तेची सारी यंत्रणा साम, दाम, दंड, भेद याचा वापर करुन राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या भावाला कधीही भीती वाटली नाही आणि कधीही वाटणार नाही. सत्य बोलत जगलो, सत्य बोलतच राहणार. देशातील जनतेचा आवाज बुलंद करत राहू. सत्याची शक्ती आणि करोडो देशवासीयांचे प्रेम त्यांच्या पाठीशी आहे. असं ट्विट प्रियांका गांधी यांनी केलं आहे.
Rahul Gandhi tweet : काय होते प्रकरण ?
२०१९ मध्ये लोकसभा निवडणूक प्रचारासाठी कर्नाटकमधील कोलार येथे राहुल गांधी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी मोदी यांच्या नावावरुन आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांनी म्हटले होते की, "देशातील सर्वच घोटाळ्यातील आरोपींचे नाव मोदी आहे."
याप्रकरणी भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल यांच्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाच्या प्रतिष्ठेला धक्का लागल्याचा आरोप मंत्री पूर्णेश मोदी यांनी केला होता. मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्या न्यायालयाने गेल्या शुक्रवारी दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकल्यानंतर निकालासाठी २३ मार्चची तारीख निश्चित केली होती. कोर्टाने त्यांना दोषी ठरवत दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. या शिक्षेनंतर त्यांनी केलेले ट्विट राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे.