महू : वृत्तसंस्था ; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रा. स्व. संघ यांच्यासोबत आपली लढाई असली तरी त्यांच्याबद्दल आपल्या मनात द्वेष नाही, असे प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थान असलेल्या महूमध्ये भारत जोडो यात्रा पोहोचल्यानंतर त्यांनी बोलताना डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. ते म्हणाले की, या ठिकाणी संविधान दिनी येता यावे यासाठी प्रथमच यात्रेचा मार्ग बदलण्यात आला. सरदार पटेल, मौलाना आझाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेकांनी राज्यघटना तयार करण्यात अमूल्य योगदान दिले आहे.
गांधी म्हणाले की, शांतता आणि अहिंसा हे दोन महत्त्वाचे विषय आहेत. हिंसेने आपल्या वैयक्तिक जीवनात मोठी हानी केली आहे. पण आपल्या मनात कसलीही भीती नाही. उलट सर्वांबद्दल प्रेमच आहे. आपली लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रा. स्व. संघासोबत असली तरी त्यांच्याबाबत मनात किंचितही द्वेषभावना नसल्याचे ते म्हणाले.