नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सोमवार ( दि.७ ) लोकसभh खासदारी पुन्हा बहाल करण्यात आली. यानंतर आज (दि.८) 12 तुघलक लेन येथे त्यांचा जुना सरकारी बंगला पुन्हा एकदा त्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. संसदेच्या सभागृह समितीने यासंदर्भात निर्णय घेतला आहे. याबाबत राहुल गांधी यांना विचारले असता त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, माझे घर संपूर्ण भारत आहे.
मोदी आडनाव टिप्पणी प्रकरणी सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. गुजरात उच्च न्यायालयानेही ही शिक्षा कायम ठेवली. मात्र ४ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा अंतरिम आदेश दिला होता. या निर्णयानंतर सोमवारी राहुल गांधी यांचे लोकसभा सचिवालयही बहाल करण्यात आले होते.
सुरत सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांना २२ एप्रिलपर्यंत त्यांचे सरकारी निवासस्थान रिकामे करण्यास सांगितले. त्यांनी २२ एप्रिल रोजी आपला अधिकृत बंगला रिकामा केला होता. बंगला रिकामा करताना ते म्हणाले होते की, सत्य बोलण्याची ही किंमत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या विरोधातील खटला फेटाळला नाही, मात्र त्यांच्या शिक्षेला अंतरिम स्थगिती दिली आहे. आता या प्रकरणी नव्याने सुनावणी होणार आहे. त्यांची शिक्षा सर्वोच्च न्यायालयातही कायम राहिली तर त्यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले जाईल. त्याचबरोबर कोर्टाने निर्दोष सोडल्यास किंवा दोन वर्षांपेक्षा कमी शिक्षा झाल्यास राहुल निवडणूक लढवू शकतील. मात्र, हा निर्णय कधी येतो, हे पाहावे लागेल. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर न्यायालयाचा निर्णय येईल, असेही होऊ शकते. अशा स्थितीत राहुल गांधी २०२४ ची निवडणूक लढवू शकतात.
हेही वाचा :