पुढारी ऑनलाईन डेस्क : R Ashwin New Record : भारताचा दिग्गज ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये एक नवीन कामगिरी केली आहे. तो भारतीय मैदानावर सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने याबाबतीत अनिल कुंबळेला मागे टाकून नवा इतिहास रचला आहे. रांची येथे खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात अश्विनने सलग दोन चेंडूत दोन बळी घेत दोन मोठे यश आपल्या नावावर केले. त्याने रांची कसोटीत तिस-या दिवसाच्या तिस-या सत्रापर्यंत एकूण 6 विकेट्स मिळवल्या आहेत.
अश्विनने इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट झेलबाद होताच भारतातील कसोटी क्रिकेटमध्ये 350 बळी पूर्ण केले. पुढच्याच चेंडूवर त्याने ओली पोपला एलबीडब्ल्यू आऊट केले. अशा प्रकारे त्याने 351 वा बळी मिळवत माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेचा (350 बळी) विक्रम मोडीत काढला. अशाप्रकारे अश्विन आता भारताकडून सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज बनला आहे.
आर अश्विनने राजकोट येथील सामन्यात कसोटीतील 500 बळी पूर्ण केले होते. अशी कामगिरी करणारा तो भारताचा दुसरा गोलंदाज बनला. अश्विनपूर्वी कुंबळेने भारताकडून 619 बळी घेतले होते. अश्विनने 114व्या डावात 350 बळींचा टप्पा पार केला, तर अनिल कुंबळेने 115 डावात भारतीय भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये 350 बळी पूर्ण केले. अश्विनने सलग दोन चेंडूंत दोन बळी घेत कुंबळेचा विक्रम मोडीत काढला.
रांची येथे खेळल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात टीम इंडियाने फिरकीपटूंसह गोलंदाजीची सुरुवात केली. आर अश्विनने नव्या चेंडूने डावाला सुरुवात केली आणि दुसऱ्या टोकाकडून रवींद्र जडेजाने गोलंदाजी केली. अश्विनने तिसऱ्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर बेन डकेटला सरफराज खानकडे झेलबाद केले आणि शेवटच्या चेंडूवर ऑली पोपला एलबीडब्ल्यू आऊट करून भारतातील कसोटी क्रिकेटमधील 351 बळी पूर्ण केले.