पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने माघार घेतल्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. गुरुवारी (28 जुलै) होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात सिंधूला भारताचा ध्वजवाहक बनवण्यात आले आहे. सिंधूला सलग दुसऱ्यांदा ही संधी मिळाली आहे. 2018 मध्ये ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या स्पर्धेत ती भारताची ध्वजवाहक होती. (PV Sindhu to Be Indias Flagbearer For Commonwealth Games 2022)
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूला उद्घाटन समारंभासाठी भारतीय संघाचा ध्वजवाहक बनवण्यात आले आहे.
गुरुवारी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यात एकूण 164 खेळाडू सहभागी होणार आहेत. माजी विश्वविजेती सिंधू बर्मिंगहॅम येथे महिला एकेरीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या प्रमुख दावेदारांपैकी एक आहे. गोल्ड कोस्टमध्ये 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सिंधू ध्वजवाहक होती.