पुणे, पुढारी वृत्तसेवा : राज्यात वाढत असलेली कोरोना बाधितांची संख्या आणि राज्य सरकार व स्थानिक प्रशासन यांच्याकडून परिस्थितीनुसार वेळोवेळी बदलण्यात येत असलेली नियमावली यामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर येत्या २ ते ६ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात येत असलेला ६८ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द करण्यात येत असल्याचे आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी कळवले आहे.
यंदा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे जन्म शताब्दी वर्ष असल्याने महोत्सव व्हावा, अशी रसिकांची प्रबळ इच्छा होती. परंतु महोत्सवाची भव्यता, व्याप्ती व आयोजनासाठी लागणारा वेळ बघता सद्य परिस्थितीत महोत्सव रद्द करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नसल्याचे जोशी यांनी सांगितले.