पुढारी ऑनलाईन :
पुणे : शहराला पाणीपुरवठा करणार्या धरणांमधील पाणीसाठ्याचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज आढावा घेतला. या बैठकीत पुणेकरांची पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. धरणांमधील पाणीसाठा 72.65 टक्क्यांवर पोहचल्याने आणि खडकवासला धरण 96 टक्के भरल्याने हा निर्णय घेतला गेला आहे. सर्किट हाऊसमध्ये पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी राजेश देशमुख, महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते
आठवड्यातून एक दिवस शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवला जात होता. खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जुन महीन्यात अपेक्षित पाऊस पडला नाही. तीस जुन रोजी धरणांत एकुण 4.70 टिएमसी इतका पाणीसाठा होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत तो अधिक होता. परंतु पाऊस न पडल्याने पाणी कपातीचा निर्णय घेण्याची वेळ आली होती. जुलै महीन्यात मात्र पावसाने धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगली हजेरी लावली आहे. खडकवासला, पानशेत, वरसगांव आणि टेमघर या चारही धरणातील एकुण पाणीसाठा 21.18 टिएमसीपर्यंत पोचला आहे. गेल्यावर्षी याच दिवशी 21. 46 टिएमसी इतका पाणीसाठा होता. तुलनेत गेल्यावर्षीच्या तुलनेत थोडा कमी पाणी साठा आहे. परंतु, मान्सुनचे आणखी दोन महीने बाकी आहेत. या कालावधीतही धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ शकते. वर्षभराची पुणे शहराची पाण्याची गरज भागविली जाऊ शकते एवढा पाणीसाठा हा चारही धरणांत झाला आहे.
हेही वाचा :