'पुढारी'च्या वाटचालीतील मैलाचा दगड ठरणारे 'पुढारी न्यूज' हे दूरचित्रवाणी चॅनेल 'आवाज जनतेचा' असे ब्रीद घेऊन सुरू झाले. माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यम समूह ही 'पुढारी'ची ओळख कायम आहे. अवघ्या दोनशे दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राचे मन जाणून घ्यावे, या उद्देशाने आम्ही 'पुढारी न्यूज'तर्फे 'महापोल' केला. महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघ आणि प्रत्येक महसूल विभागात गेला महिनाभर सर्व्हे केला गेला. हा सर्व्हे महाराष्ट्रातील आजवरचा सर्वात मोठा आहे, हे आम्ही ठामपणाने म्हणू शकतो. कोणत्याही पाहणीचे निष्कर्ष कसदार बातम्यांना जन्म देतात. 'पुढारी न्यूज' सुरू होत असताना, अशा कसदार आणि प्रत्यक्ष पाहणीतून आलेल्या बातम्या सादर करण्याची संधी या निमित्ताने आम्ही घेतली. 'पुढारी न्यूज'वर ही पाहणी प्रक्षेपित केली जात असताना 'पुढारी'च्या वाचकांसाठीही आम्ही ती देत आहोत.
या पाहणीतून दोन ठळक निष्कर्ष निघतात, एक म्हणजे नरेंद्र मोदी यांनी देशाचा कमावलेला विश्वास पंतप्रधानपदाची नऊ वर्षे पूर्ण
झाल्यानंतरही कायम आहे आणि पुन्हा एकदा त्यांच्यावरच जबाबदारी सोपविण्याची महाराष्ट्राची इच्छा कायम आहे. महाराष्ट्राने 2014 आणि 2019 मध्ये जेवढे घवघवीत यश भाजपा आणि शिवसेना युतीच्या पारड्यात टाकले, तितक्या मोठ्या यशाची पुनरावृत्ती होताना दिसत नसली, तरीही अनुकूलता भाजपा आणि मित्रपक्षांच्याच बाजूने अधिक आहे, हे स्पष्ट दिसते आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या चार वर्षांत प्रचंड उलथापालथ घडत राहिली. राजकीय शह-काटशहांना आणि कुरघोड्यांना ऊत आला. त्यातून एक अस्वस्थता महाराष्ट्राच्या मनात निर्माण झालेली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या राजकारणात त्याचे पडसाद उमटणार की नाही, याची कमालीची उत्सुकता होती. महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्षांचे विभाजन झालेले असून, त्यांच्या ताकदीत घट झाली आहे, हे स्पष्ट झाल्याचे ही पाहणी सांगते. त्याचबरोबर मूळ पक्षांकडे, म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना फुटलेल्या गटांपेक्षा अधिक मान्यता आहे, हेही यातून दिसून आले आहे.
पाहणीतील निष्कर्ष प्रत्यक्ष निवडणुकीत कायम राहिले, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील अस्थिरता लोकसभेच्या निवडणुकीनंतर
संपुष्टात येणार की त्याला आणखी एखादे वळण मिळणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.