Latest

पुणे: आळंदीतील इंद्रायणी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर फेस; नागरिकांच्या जीवाशी खेळ

अमृता चौगुले

आळंदी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: आळंदी येथे इंद्रायणी नदी पात्रामध्ये सद्या मोठ्या प्रमाणात फेसयुक्त पाणी येत आहे. यामुळे सिद्धबेट बंधाऱ्या नजीक दुर्गंधी पसरली आहे. पिंपरी – चिंचवडच्या कुदळवाडी भागातील कंपण्यामधून निघणारे केमिकल मिश्रीत पाणी इंद्रायणी नदीत मिसळत आहे. यामुळे प्रदूषणात भीषण वाढ झाली आहे. या सर्व प्रकाराकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. गेले आठ दिवसांपासून नदीला फेसयुक्त पाणी आले आहे. या फेसाचे डोंगर झाले असून आळंदीत जणू स्विर्त्झंलड अवतरले आहे की काय? असे चित्र आहे.

या फेसयुक्त पाण्यामुळे आळंदीकरांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या  इंद्रायणीची पाणी पातळी चांगली आहे. यातूनच शेतीसाठी पाण्याचा वापर होत आहेता. शेतात देखील हेच फेसयुक्त पाणी वाहताना दिसून येतंय. नदीत फक्त सांडपाणीच वाहत आहे. या पाण्याबरोबर जलपर्णी देखील वाहून येत असून ज्ञानेश्वर मंदिर जुन्या बंधाऱ्या नजीक मोठ्या प्रमाणात जलपर्णीचा ढीग साचला आहे. आळंदी शहराच्या मध्यवर्ती भागातील पात्रामध्येच सांडपाणी, जलपर्णी साचल्याने इंद्रायणी नगर, गोपाळ पुरा भागात डासांचा उपद्रव वाढला आहे.  दरम्यान इंद्रायणी प्रदूषणाचे वाढते प्रमाण चिंताजनक असून गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे अगोदरच आरोग्य व आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना नदी प्रदूषणामुळे आरोग्याच्या तक्रारीचा सामना करावा लागत आहे.

SCROLL FOR NEXT