नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून सरकारी विभाग तसेच संघटनांमधील नवनियुक्तांना ५१ हजार नियुक्ती पत्रांचे वितरण केले. रोजगार मेळाव्याअंतर्गत ही नियुक्तीपत्रे वितरीत करण्यात आली. यावेळी पंतप्रधानांनी या नियुक्त्यांना संबोधित केले. (Rozgar Mela)
"तरुणांना देशसेवा करण्याची इच्छा असते. आज ज्यांना नियुक्तीपत्रे मिळाली आहेत त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. मी त्यांना या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशवासीयांचे 'अमृत रक्षक' म्हणतो," असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
हा रोजगार मेळावा देशभरात ४५ वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आला. केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), सीमा सुरक्षा दल (BSF), सशस्त्र सीमा बल (SSB), आसाम रायफल्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस (ITBP), नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि दिल्ली पोलीस यासह विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये (CAPF) कर्मचार्यांची भरती करणे हा या रोजगार मेळाव्याचा उद्देश आहे. या मेळाव्याचे आयोजन केंद्रीय गृह मंत्रालयाने केले आहे.
देशभरातून नवीन भरती झालेले हे उमेदवार गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध संस्थांमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी), उपनिरीक्षक (जनरल ड्युटी) आणि नॉनजनरल ड्युटी नसलेल्या कॅडेर पदांवर रुजू होतील. (Rozgar Mela)
रोजगार मेळावा हे रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने एक पाऊल आहे, असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा ;