पुढारी वृत्तसेवा; नवी दिल्ली : भ्रष्टाचार हा लोकशाहीच्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा असून भ्रष्टाचारी व्यक्तीला दया दाखविण्याचे काहीही कारण नाही, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.३) सीबीआयच्या साठाव्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना दिला. पुणे, नागपूर आणि शिलाॅंग येथील सीबीआयच्या नवीन कार्यालयांचे उद्घाटनही मोदी यांनी यावेळी केले.
सीबीआयने आपले तंत्र आणि कार्याच्या माध्यमातून लोकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे, असे सांगून मोदी पुढे म्हणाले की, आजही जेव्हा एखाद्या प्रकरणाचा तपास लागत नाही, तेव्हा संबंधित प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी केली जाते. व्यावसायिक आणि प्रभावी संस्थांशिवाय विकसित देशाची निर्मिती होणे शक्य नाही. अशावेळी सीबीआयसारख्या संस्थांवरील जबाबदारी वाढते. भ्रष्टाचाराविरुध्द लढण्यासाठी केंद्र सरकारकडे राजकीय इच्छाशक्तीची कमतरता नाही. मागील काही वर्षांत सीबीआयच्या कामाची व्याप्ती कितीतरी पटीने वाढली आहे. अलिकडील काळात तर सायबर गुन्ह्यांची उकल देखील सीबीआयला करावी लागत आहे.
PM Narendra Modi : टपाल तिकिटाचे आणि नाण्याचे अनावरण
ज्या लोकांविरोधात तुम्ही लढा देत आहात, त्या व्यक्ती खूप शक्तीशाली आहेत. हे लोक बराच काळ सरकार आणि यंत्रणेमध्ये ठाम मांडून होते. आताही काही राज्यांमध्ये हे लोक सत्तेत आहेत. पण तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे. कोणताही भ्रष्टाचारी व्यक्ती सुटता कामा नये, याची दक्षता घ्या, असा संदेश मोदी यांनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिला. राष्ट्रपती पोलिस पदक विजेत्या तसेच उत्कृष्ट कामगिरी केलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांचा यावेळी पंतप्रधानांच्या सत्कार करण्यात आला. एका विशेष टपाल तिकिटाचे आणि नाण्याचे अनावरणही मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
भ्रष्टाचार हा प्रतिभेचा सर्वात मोठा शत्रू
सीबीआयच्या कामाची व्याप्ती वाढली असून महानगरापासून ते जंगलापर्यंत सीबीआयला धाव घ्यावी लागत आहे, असे सांगत मोदी म्हणाले की, वर्ष 2014 मध्ये रालोआची सत्ता आली. त्यानंतर लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास परत आणण्यासाठी सर्वप्रथम आम्हाला काम करावे लागले. यासाठी काळ्या पैशापासून ते बेनामी संपत्तीपर्यंतच्या मुद्द्यांसाठी 'मिशन मोड'वर काम करावे लागले. ज्या-ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो, त्या ठिकाणी युवकांना संधी मिळत नाही. अशाजागी विशेष इको-सिसि्टम काम करीत असते. भ्रष्टाचार हा प्रतिभेचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि यातूनच परिवारवादाला बळ मिळते. परिवारवाद जेव्हा वाढतो, तेव्हा समाज आणि देशाचे सामर्थ्य कमी होते आणि जेव्हा देशाचे सामर्थ्य कमी होते तेव्हा विकास प्रभावित होतो.
हेही वाचा