पुढारी ऑनलाईन डेस्क : अयोध्येमधील राम मंदिरात आज ( दि. २२) अभूतपूर्व उत्साहात रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. २२ जानेवारी २०२४ चा सूर्य एक तेजस्वी प्रकाश घेऊन आला आहे. ही कॅलेंडरवर लिहिलेली तारीख नाही, तर ती काळाच्या नवीन चक्राची उत्पत्ती आहे. आमचे रामलल्ला आता तंबूत राहणार नाही. ते आता या दिव्य मंदिरात राहणार आहेत, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर बोलताना व्यक्त केला. जाणून घेवूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील ठळक ९ मुद्दे…
- २२ जानेवारी २०२४ ही केवळ एक तारीख नाही, ती नवीन कालचक्राची उत्पत्ती आहे. तर एका नव्या युगाची सुरुवात आहे. राम मंदिराच्या उभारणीने लोकांमध्ये नवीन ऊर्जा भरली आहे.
- रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. न्याय दिल्याबद्दल मला सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानायचे आहेत. अयोध्येतील राम मंदिर हे कायद्यानुसार बांधले गेले आहे.
- सागर ते सरयू असा प्रवास करण्याची संधी मला मिळाली. सागर ते सरयूपर्यंत सर्वत्र राम नामाचा एकच उत्सवी भाव दिसून येतो.
- आज मी प्रभू रामाची माफी मागतो कारण आमच्या प्रेमात आणि तपश्चर्येमध्ये काहीतरी कमतरता होती ज्यामुळे हे काम (राम मंदिराचे बांधकाम) इतकी वर्षे झाले नाही. मला विश्वास आहे की प्रभू राम आम्हाला माफ करतील."
- प्रदीर्घ संघर्षानंतर प्रभू राम अखेर त्यांच्या घरी परतले. आम्ही शतकानुशतके दाखवलेल्या संयम आणि बलिदानानंतर अखेर आमचा रामलल्ला आला आहे.
- काही जण म्हणतील की, राम मंदिराच्या उभारणीमुळे आगीचे वादळ निर्माण होईल. त्यांनी पुनर्विचार करावा कारण राम ऊर्जा आहे, अग्नि नाही. राम हा वाद नाही तर समाधान आहे. राम हाच उपाय आहे.
- आपल्याला आता पुढील 1,000 वर्षांसाठी भारताचा पाया रचायचा आहे. या क्षणापासून आपण एक सक्षम, भव्य, दिव्य भारत घडवण्याची प्रतिज्ञा घेत आहोत.
- राम मंदिराचे बांधकाम हे भारतीय समाजाच्या परिपक्वतेचे प्रतिबिंब आहे. हा केवळ विजयाचा नाही तर नम्रतेचाही एक प्रसंग आहे.
- राम लल्ला आता तंबूत राहणार नाही. भव्य मंदिरातच राहणार.