पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थानमधील नाथद्वारामध्ये ५ हजार ५०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ आज ( दि. १० ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. यावेळी जाहीर सभेत बोलताना मोदी यांनी पंतप्रधान मोदी यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना आपला मित्र संबोधले. तत्पूर्वी बोलताना गेहलोत यांनी आमच्यात आमच्यात कोणतेही वैर नाही. हा केवळ विचारधारेचा लढा आहे, असे स्पष्ट केले. दरम्यान, राजस्थान काँग्रेसमध्ये गेहलोत विरुद्ध पायलट वाद पेटला असताना पंतप्रधान मोदींनी गेहलोत यांच्या मित्र म्हणून उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राजस्थान हे देशातील सर्वात मोठ्या राज्यांपैकी एक आहे. या राज्याचा जितका विकास होईल तितकी भारताच्या विकासाला गती मिळेल. नवीन योजनांनी देशाला आर्थिक गती दिली आहे. आपल्या देशातील काही लोक अशा विचारसरणीचे बळी झाले आहेत, त्यांच्यात नकारात्मकता भरलेली आहे. या लोकांना देशात काही चांगले होताना बघायचे नाही. त्यांना फक्त वाद निर्माण करायला आवडतात.जे सर्व काही मतांच्या तराजूवर मोजतात, त्यांना देशाचे भविष्य डोळ्यासमोर ठेवून नियोजन करता येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
अशोक गेहलोत म्हणाले की, " राजस्थानमध्ये चांगली कामे झाली आहेत, राजस्थानमध्ये रस्ते चांगले आहेत. पूर्वी आम्ही गुजरातशी स्पर्धा करायचो आणि आम्ही मागे पडलो असे वाटायचे; पण आता आम्ही पुढे गेलो आहोत. आमच्या सरकारच्या सुशासनामुळे राजस्थान आर्थिक विकासाच्या बाबतीत देशात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे. आपल्या राज्याच्या प्रलंबित मागण्यांबाबत मी पंतप्रधान मोदींना पत्रे लिहित आहे आणि लिहित राहीन.
आज सर्वजण एका व्यासपीठावर बसले आहेत, अशा संधी क्वचितच येतात. लोकशाहीत शत्रुत्व नसते. विचारधारेची लढाई असते. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. ही परंपरा देशात कायम राहिली पाहिजे. देशातील सर्व धर्माच्या लोकांमध्ये प्रेम आणि बंधुभाव असला पाहिजे. या भावनेतून आपणही एक दिवस विश्वगुरू होऊ, असा विश्वासही यावेळी गेहलोत यांनी व्यक्त केला.
विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करताना राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र. सोबत मुख्यमंत्री अशोक गहलोत