नागपूर; पुढारी वृत्तसेवा : आता त्यांच्याजवळ कुठलेही चेहरे बाकी राहिले नाही, भाजप जवळचे सगळे चेहरे संपलेले आहेत. भाजपचा खोटारडेपणाचा बुरखा फाटलेला आहे त्यामुळे मूळ मुद्द्यापासून डायव्हर्ट करण्यासाठी त्यांनी जे मुद्दे आणले त्यावर आता कोणीही विश्वास करायला तयार नाही असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला. . दहा वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सरकारने या देशाची जी माती केली, ते जनतेला दाखवून देण्याचा आमचा उद्देश आहे .3 सप्टेंबरपासून आमची जनसंवाद पद यात्रा महाराष्ट्रात सुरू होत आहे. ही यात्रा प्रत्येक गावात आणि प्रत्येक शहराच्या भागात जाणार असल्याची माहिती पटोले यांनी दिली. रविभवन येथे या यात्रेच्या पूर्वतयारीसाठी झालेल्या बैठकीत खूप दिवसांनी काँग्रेसचे एकीचे प्रदर्शन कार्यकर्त्यांना झाले. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, परंपरागत प्रतिस्पर्धी माजी मंत्री डॉ नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी अगदी शेजारी बसले आणि विनोदात रमलेले दिसले. याशिवाय माजी मंत्री सुनील केदार,शहर अध्यक्ष आ विकास ठाकरे, समनवयक नाना गावंडे आदी प्रामुख्याने हजर होते.
पटोले म्हणाले, गेल्या दहा वर्षांमध्ये नरेंद्र मोदी सरकारने संवैधानिक व्यवस्थेला संपवलं, या देशाला बेरोजगारांचा देश बनवला, शेतकऱ्यांना आत्महत्या करायला परावृत्त केलं,महागाई वाढवली, मुठभर लोकांसाठी हा देश चालवला जात आहे. रोज महापुरुषांचे, थोर नेत्यांचे अपमान करण्याचे पाप हे सरकार करते आहे. या सगळ्या गोष्टीची जनतेमध्ये चीड आहे. या त्यांच्या भावना समजून काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता संपूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे. काँग्रेस ही देशाच्या संविधानिक व्यवस्थेला न्याय देणारी पार्टी आहे त्यामुळे जनतेने काँग्रेसच्या पाठी उभे राहण्याचा संकल्प या यात्रेच्या माध्यमातून केला जाणार आहे.या सरकारच्या योजना कशा बोगस आहेत आणि जनतेला कसं लुटून व्यापारी लोकांना मोठं केलं, नरेंद्र मोदींना गुजरातचे मुख्यमंत्री असताना जाण्यास बंदी होती , मात्र ते प्रधानमंत्री झाल्यावर अमेरिकेत गेले आणि त्यांनी तिथे सांगितलं की मै व्यापारी हूं आणि व्यापारी कसा जनतेला लुटतो याचा प्रत्यय जनतेला येत आहे. डीजल, पेट्रोलवर शेतकऱ्यांच्या नावाने कर घेतला जातो वेगवेगळ्या मार्गाने खरबो रुपये जमा केले जातात.अठरा कोटीचा रस्ता अडीचशे कोटीमध्ये कसा केला जातो हे कॅग रिपोर्टमधून समोर आले ज्या कमिटीचे अध्यक्ष प्रधानमंत्री आहेत, त्यांचं सरकार आणि मंत्री कसे भ्रष्टाचारी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. महागाई कृत्रिमरित्या वाढवली आहे, शेतकऱ्यांना फसवलं जात आहे या सगळ्या गोष्टीची पोलखोल करणार. महाराष्ट्रात येड्याची सरकार आहे, त्याची पोल उघडकीस आणून भाजप विरोधात जो राग आहे. तो राग जनतेपर्यंत पोहोचून त्यांची सत्ता उलटवून लावणं हा पदयात्रेचा उद्देश आहे यावर पटोले यांनी भर दिला.