नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूरमध्ये सात जणांच्या टोळीने प्रवाशांची बस लुटल्याची घटना समोर आली आहे. प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून ही लुटमार करण्यात आल्याची माहिती प्रवाशांनी दिली. या घटनेत एकूण पावणे दोन लाखांचा ऐवज लुटल्याची प्राथमिक माहिती आहे. रामटेक पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील आमडी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग ४४ येथे आज बस लुटल्याची घटना घडली. सात जणांच्या टोळीने मिळून ८० प्रवाशांची बस लुटली. चोरट्यांनी प्रवाशांकडून एकूण १ लाख ९६ हजार रुपयांचा ऐवज लुटून पळ काढला. फिर्यादीच्या तक्रारीवरून रामटेक पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणातील संशयित तीन आरोपींना अटक करण्यात आले आहे.
दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अमन ईश्वर इंगळे (२६ वर्षे, रा. रामबाग नागपूर), गुलाब शाबीर शेख (३२ वर्षे, रा. कपिलनगर नागपूर), रशीक शेख रफिक शेख (३४ वर्षे, रा. दिघोरी नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.