पंढरपूर : कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा गुरुवारी (दि. 23) लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होत आहे. कार्तिकी एकादशीची श्री विठ्ठल व रुक्मिणीची मातेची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक होत आहे. आषाढी यात्रेची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या तर कार्तिकी यात्रेची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची परंपरा आहे. ही परंपरा तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यापासून सुरू झाली. ती अद्याप पर्यंत सुरू आहे. Kartiki Mahapuja
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून कार्तिकी यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्र्यांना शासकीय महापूजेचे रीतसर निमंत्रण देण्यात येते. राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी कार्तिकी यात्रेत श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. तेव्हापासून ही परंपरा कायम पाळण्यात येत आहे. Kartiki Mahapuja
कार्तिकी एकादशीला विठ्ठलाचे स्मरण, उपवास करण्यात येतो. कार्तिक द्वादशीपासून चातुर्मास संपतो. यादिवसापासून तुळशी विवाहास आरंभ होतो. या दिवसापासून लग्नकार्य, बारसं यासह सर्व शुभ कार्ये सुरू होतात. धार्मिक मान्यतेनुसार, कार्तिकी एकादशीच्या दिवसापासून विश्वाचे नियंत्रक भगवान विष्णू आणि सर्व देव चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि आपापली कर्तव्ये स्वीकारतात. त्यामुळे कार्तिकी एकादशीला विशेष महत्त्व आहे.
आषाढी यात्रा ही वर्षभरात साजर्या होणार्या महत्त्वाच्या चार यात्रापैकी सर्वात मोठी यात्रा आहे. या यात्रेत १० ते १५ लाख भाविक येतात. राज्याचे मुख्यमंत्री आषाढी यात्रेत विठ्ठलाची शासकीय महापूजा करतात. यानंतरची महत्त्वाची यात्रा म्हणून कार्तिकी यात्रेकडे पाहिले जाते. याही यात्रेला ८ ते १० लाख भाविक पंढरीत येतात. या यात्रेच्या एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा करण्याची परंपरा अलीकडे निर्माण झाली आहे.
महापुजेनंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री विठ्ठल मंदिर व पंढरपूर शहर विकासासाठी कोट्यावधी रुपयांच्या विकास निधीची घोषणा करतात. वारकरी, शेतकरी, राज्यातील जनतेसाठी नवीन योजनांची घोषणाही या दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आवर्जून करतात. यामुळे या महापूजेनंतरच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या मीडिया संवादाकडे राज्याचे लक्ष असते.
हेही वाचा