पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यात सोमवारी दाखल होत असताना पुणेकरांनी मोठ्या उत्साहाने त्यांचे स्वागत केले. वारकर्यांचा मंगळवारी पुण्यात मुक्काम असून, त्यांची नाष्ट्यापासून जेवणापर्यंतची सोय करण्यासाठी पुण्यातील विविध संस्था, मंडळे सज्ज झाली आहेत. वारकर्यांनीही मोठ्या आनंदात खेळ खेळत, फुगड्या घालत, टाळांच्या गजरात अभंग गात मोठ्या भक्तिभावाने पुण्यात प्रवेश केला. पुण्यात आलेल्या वारकर्यांचे आज ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
दोन्ही पालखी सोहळ्यांसोबत आलेल्या वारकर्यांंनी सोमवारी पुण्याच्या विविध भागांत मुक्काम केला आहे. पुण्यातील प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणार्या वारकर्यांच्या सेवेसाठी रिक्षाचालक पुढे सरसावले आहेत. वैद्यकीय उपचार, विविध सेवा देण्यासाठीही स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे.
हातात टाळ घेऊन जयघोष करणार्या….डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पालखीत सहभागी झालेल्या….उतारवय असूनही विठुमाउलीला भेटण्यासाठी वय विसरत पंढरपूरकडे निघालेल्या आणि कॅमेर्यातून पालखीची क्षणचित्रे टिपणार्या महिला-युवतींचा पालखीत उत्स्फूर्त सहभाग दिसला. दोन वर्षांच्या लहान मुलीपासून ते 90 वर्षांच्या आजीपर्यंत…सगळ्यांचा उत्साह आणि ऊर्जा पालखीत पाहायला मिळाली.
पायी चालणार्या वारकरी महिलांची ऊर्जा तर काही औरच होती. पण, वैद्यकीय सेवेत काम करणार्या डॉक्टर, परिचारिकांनी बजावलेली सेवा आणि पोलिस बंदोबस्त चोखपणे बजावणार्या महिला पोलिसांचेही योगदान वाखाणण्याजोगे होते. पालखी सोहळा पाहायला आलेल्या महिला-युवतींपासून ते सफाई कामगार महिलांनी बजावलेल्या सेवेपर्यंत सगळ्यांमध्ये महिलाही हिरीरीने सहभागी झाल्या.
देदीप्यमान सोहळ्यात महिलाही आपल्या सेवा बजावताना दिसल्या. वैद्यकीय सेवा असो वा पोलिस बंदोबस्त यासह वारकरी महिलांचाही यंदा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात पायी चालणार्या वारकरी महिला असो वा फेसबुक लाइव्ह करणार्या युवतीपर्यंत…सगळ्यात महिला-युवती सहभागी झालेल्या पाहायला मिळाल्या.
नव्वद वर्षीय वारकरी महिला सयाबाई म्हणाल्या, की मी मूळची उस्मानाबाद जिल्ह्याची असून, मी बर्याच वर्षांपासून पालखीत सहभागी होत आहे. हा आनंद काही औरच असतो. पालखीत चालण्याचा आनंद वेगळाच असतो. यंदाही पंढरपूरपर्यंत चालत जाणार आहे. तरुणी योगिता पानसरे म्हणाली, कही पालखी सोहळा महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल सोहळा आहे. तोच अद्वितीय सोहळा अनुभवण्यासाठी आले होते. वारकर्यांना पाहून खूप उत्साह आणि नवी ऊर्जा मिळाली.
हेही वाचा