पुणे : राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून गतवर्ष 2022-23 मध्ये 40 हजार 95 हेक्टरवर फळबागा फोफावल्या आहेत. त्यामध्ये शेतकर्यांचे सर्वाधिक प्राधान्य हे आंबा पिकास असून, त्याखालोखाल संत्रा, काजू, मोसंबी, सीताफळ आणि डाळिंबाचा समावेश आहे. 'मनरेगा'तून फळबाग लागवडीने चांगली कामगिरी बजावली आहे. शासनाने गतवर्षात 60 हजार हेक्टरचे दिलेले उद्दिष्ट आणि झालेली फळबाग लागवड पाहता 67 टक्के क्षेत्रावर फळबाग लागवड पूर्ण झाली आहे.
विभागनिहाय झालेली फळबाग लागवड हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे : ठाणे 8689, नाशिक 6289, पुणे 5878, कोल्हापूर 1061, औरंगाबाद 2460, लातूर 3344, अमरावती 6828, नागपूर 5543 हेक्टर. फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते म्हणाले की, शेतकर्यांना स्वतःच्या शेतावर फळबाग लागवडीद्वारे रोजगारनिर्मिती करून आर्थिक स्तर उंचाविण्यास प्राधान्य दिले जाते.
फळपिकांखालील क्षेत्र वाढवून शेतीपूरक व्यवसायात वाढ करणे व उत्पादन वाढविणे, हा योजनेचा प्रमुख उद्देश आहे. तसेच, योजनेतून प्रामुख्याने वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेतावर, शेतीच्या बांधावर, शेतकर्यांच्या पडीक जमिनीवर फळबाग लागवड करण्यात येते. फळबाग लागवडीतून जमिनीची धूप कमी होऊन पर्यावरणाचा समतोल राखला जातो. शेतकर्यांकडे पाण्याची शाश्वत उपलब्धतेची खातरजमा करून प्रस्तावास मान्यता दिली जाते.
आंबा 19515, संत्रा 4329, काजू 3459, मोसंबी 2930, सीताफळ 1906, लिंबू 1695, नारळ 1572, डाळिंब 1392, पेरू 706, बांबू 566, फणस 371, चिकू 254, शेवगा 191, कोकम 178 हेक्टरचा समावेश आहे.