पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप विचारधारेला विराेध हेच आमचे लक्ष्य आहे. ही लढाई विरोधी पक्ष आणि भाजप यांच्यातील नाही तर तर देशातील दडपशाहीविरोधातील लढाई आहे, अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज (दि.१८) आपली भूमिका मांडली. बंगळूर येथे विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी राहुल गांधी म्हणाले, "आज आमची दुसरी बैठक झाली. आमची सर्वांची सकारात्मक चर्चा झाली. ही लढाई भाजपच्या विचारांविरोधात आहे. ही दोन विचारांमधील लढाई आहे. देशातील बेरोजगारी वाढत आहे. देशातील संपत्ती काही विशिष्ठ लोकांच्या हाती जात आहे. ही लढाई विरोधी पक्ष आणि भाजप यांच्याविरोधात नाही तर देशातील दडपशाहीविरोधातील लढाई आहे. त्यामुळे आम्ही या आघाडीला इंडिया हे नाव दिले आहे."
भाजप विचारधारेला विराेध हेच आमचे लक्ष्य आहे. जो कोणी भारताविरोधात उभा राहतो, तेव्हा त्याचा पराभव होतो, हे तुम्हाला माहित आहे. आता 'इंडिया' आघाडीची पुढील बैठक महाराष्ट्रात होईल. या बैठकीत आम्ही एकसंघपणे एक विचार मांडू. हा विचार आम्ही देशभरात घेवून जाणार आहे, असेही राहुल गांधी यांनी या वेळी स्पष्ट केले.