पुढारी ऑनलाईन : गेल्या काही महिन्यांपासून देशातील बाजारात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. या पाठोपाठच आता कांद्याचे दरही जवळपास दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळेल. पण या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Onion price) फटका बसण्याची शक्यता आहे.
पुढील महिन्यापर्यंत दर्जेदार कांद्याची किंमत जवळपास दुप्पट होण्याची शक्यता आहे. कांद्याचा दर साधारण ५५ ते ६० रुपये प्रति किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने बफर स्टॉकमधून ३ लाख मेट्रिक टन बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ग्राहकांना दिलासा मिळेल, परंतु शेतकरी अडचणीत येण्याचीही शक्यता आहे. तसेच ग्राहक व्यवहार विभागाने म्हटले आहे की, किरकोळ किमती जास्त असलेल्या राज्यांत बफर स्टॉकमधील कांदा पाठवण्याचा निर्णय (Onion price) घेतला आहे.
देशात ज्याठिकाणी कांद्याच्या किरकोळ किमती अखिल भारतीय सरासरीपेक्षा जास्त आहेत. तसेच जिथे मागील महिन्याच्या आणि वर्षाच्या तुलनेत कांद्याच्या किंमतीत वाढ झाली आहे, अशा राज्यांमधील किंवा प्रदेशातील प्रमुख बाजारपेठांना लक्ष्य करून कांद्याचा साठा रिलीज करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे, असे ग्राहक व्यवहार विभागाने स्पष्ट केले आहे.
गेल्या चार वर्षांच्या तुलनेत केंद्र सरकारकडील कांद्याच्या बफर स्टॉकचा आकार तिप्पट झाला आहे. 2020-21 मध्ये केंद्राकडील कांद्याचा बफर स्टॉक 1 लाख मेट्रिक टन होता. तो 2023-24 मध्ये ३ लाख मेट्रिक टन इतका झाला आहे. केंद्राकडील कांद्याचा बफर स्टॉक ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत कांद्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आणि किमतीची स्थिरता राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे ग्राहक व्यवहार विभागाने दिलेल्या अहवालात म्हटले आहे.