मुंबई : पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीत जागावाटपावरून कोणतेही मतभेद नाहीत. महाविकास आघाडी ही कायम एकजुटीने राहणार आहे. मी तुम्हाला स्टॅम्पपेपरवर लिहून देतो, असा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. शिवसेनेने 2019 मध्ये लोकसभेच्या जिंकलेल्या 18 जागा मिळाव्यात ही उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील पक्षांनी जिंकलेल्या जागा सोडून उर्वरित 25 जगांवर आधी चर्चा होणार असल्याचेही अजित पवारांनी सांगितले.
महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद उघड झाले आहेत. तिन्ही पक्ष आपणच मोठा भाऊ असल्याचे सांगत, जादा जागा मिळविण्यासाठी कामाला लागले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी कायम राहील का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यावर पवारांनी 'मविआ'ची एकजूट कायम राहील हे स्टॅम्पपेपरवर लिहून द्यायला तयार असल्याचे सांगितले.
जागावाटपावर झालेल्या चर्चेत उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये शिवसेनेने जिंकलेल्या 18 जागा त्यांना मिळाव्यात, अशी मागणी केली आहे. आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला नसला, तरी ज्यांनी ज्या जागा जिंकल्या आहेत त्या सोडून उर्वरित जागांवर आधी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे आधी 25 लोकसभा मतदारसंघांवर चर्चा केली जाईल, असे अजित पवार म्हणाले.
शेलारांनी दाखवलेला व्हिडीओ मणिपूरचा
भाजपचा महागाई, बेरोजगारीवरून लक्ष वळविण्याचा डाव आहे. त्यासाठी त्र्यंबकेश्वरसारखे मुद्दे तापविले जात आहेत. आशिष शेलारांना अनेक वर्षे ओळखतो. मीडियाला त्यांनी क्लिप दाखवली त्यात त्यांनी कर्नाटकचा उल्लेख केला. गायींची हत्या कशी होते हे दाखवले; मात्र ती क्लिप मणिपूरची निघाली. एका महत्त्वाच्या पक्षाचा नेता लोकांमध्ये अशा पद्धतीने बोलत असेल किंवा एखाद्या संवेदनशील गोष्टीची शहानिशा करत नाही, हे चुकीचे आहे, अशी टीका त्यांनी केली.
निर्णय वरिष्ठ नेते घेतील
एक पक्ष असला, तरी वेगवेगळ्या चर्चा होत असतातच. येथे तीन पक्ष आहेत. जागावाटपावर आता जो काही निर्णय होईल तो तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते घेतील आणि त्याची अंमलबजावणी कार्यकर्ते करतील, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.