Latest

Dilip Walse Patil : सहकारी संस्थांच्या बळकटीकरणावर अधिकार्‍यांनी लक्ष द्यावे : सहकारमंत्री

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सहकारी संस्था ग्रामीण आर्थिक विकासाचा पाया असून युवकांना रोजगार देण्याचे सहकार हे उत्तम माध्यम आहे. त्यामुळे अधिकार्‍यांनी सहकारी संस्थांच्या बळकटीकरणावर भर देण्यासाठी गावपातळीवर जाऊन शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविल्यास सहकार क्षेत्रात सकारात्मक बदल घडतील, असा विश्वास सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला. त्यासाठी अधिकार्‍यांबरोबरच संस्थांचे संचालक मंडळ, सचिव यांनाही प्रशिक्षण देण्याची आवशयकता असल्याचे ते म्हणाले.

हॉटेल आर्किड येथे आयोजित राज्यस्तरीय सहकार अधिकार्‍यांच्या परिषदेत ते बोलत होते. कार्यक्रमाला सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे आदी उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांनी सहकारी संस्थांसाठी तयार केलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

केंद्र सरकारकडून सहकार कायद्यात सुधारणा करण्यात येणार असून नवीन कायद्यानुसार अनेक प्रकारचे उपक्रम राबविण्यास परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे अधिकार्‍यांच्या जबाबदार्‍या वाढणार आहे. सहकाराच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, आर्थिक प्रगती होऊ शकते. आदिवासी, डोंगराळ भागातील सोसायट्याना चांगल्या सेवा न मिळाल्याने त्या अडचणीत जातात. त्यामुळे तक्रारींचा निपटारा कालमर्यादेत करावा. जिल्हा बँकांकडून कर्ज वाटप न झाल्यामुळे कुटुंब अडचणीत येतात. बेकायदेशीर सावकारी मोडून काढण्यासाठी कायदा केला आहे, त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे वळसे पाटील म्हणाले.

सहकार विभागाच्या भविष्यातील वाटचालीवर बोलताना राजेश कुमार म्हणाले, सहकारी संस्थाच्या सक्षमीकरणासाठी योजना तयार करुन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देऊन संस्थांना मार्गदर्शन करावे. प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थाचे संगणकीकरण करावे. 'सहकार संवाद' युट्युब वाहिनीद्वारे विविध विषयांची माहिती प्रसारित करावी, बचत गटांना विकास सोसायट्यांमार्फत मार्केटिंगची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. सहकार क्षेत्राला चालना देण्यासाठी सहकार विकास व संशोधन प्रबोधिनी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात सहकार आयुक्त अनिल कवडे म्हणाले, राज्याच्या सहकार विभागाला असलेली 100 वर्षाची गौरवशाली परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी सहकार विभागावर आहे. अधिकार्‍यांनी क्षेत्रीय स्तरावर भेटी वाढवून सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी सहकार्य करावे आणि त्यासाठी आवश्यक उपक्रम राबवावेत. यावेळी सहकार विभागातील अधिकार्‍यांनी आपापल्या विभागनिहाय माहिती सादर केली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT