पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघ हा दिग्गज फलंदाजांमुळे ओळखला जातो. यंदाच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेही आतापर्यंत टीम इंडियाच्या फलंदाजांनीच गाजवली आहे. मात्र आजचा दिवस भारताच्या गोलंदाजी आपल्या नावावर केला. वेगवान गोलंदाज बुमराह, मोहम्मद शमींचा भेदक मारा आणि यानंतर कुलदीप यादव, रवींद जडेजाने फिरकीच्या जादूवर टीम इंडियाने इंग्लंडचा धुव्वा उडवला. 230 धावांचे माफक लक्ष्याचा पाठलाग करता इंग्लंडचा डाव 129 धावांवर संपुष्टात आला. या कामगिरीमुळे या स्पर्धेत टीम इंडियाने सलग सहावा विजय आपल्या नावावर केला आहे. या विजयामुळे टीम इंडियाने गुणतालिकेत पुन्हा अग्रस्थानी झेप घेतली आहे. (ODI WC)
भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना जसप्रीत बुमराहने 35व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मार्क वुडला क्लीन बॉलिंग देऊन इंग्लंडचा डाव संपवला. वुडने केवळ एका चेंडूचा सामना केला आणि त्याला खातेही उघडता आले नाही. डेव्हिड विली 16 धावा केल्यानंतर दुसऱ्या टोकाला नाबाद राहिला. वुड आऊट होताच टीम इंडियाने मॅच जिंकली. टीम इंडियाने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताचे सहा सामन्यांतून 12 गुण झाले असून ते उपांत्य फेरी गाठण्याच्या जवळ आहे. दुसरीकडे इंग्लंडला सहा सामन्यांत पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले असून त्यांचे अवघे दोन गुण आहेत.
लखनौच्या एकना स्टेडियमवर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 50 षटकांत नऊ गडी गमावून 229 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा डाव 34.5 षटकांत 129 धावांत गारद झाला. भारताच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत इंग्लंडच्या फलंदाजांना टिकू दिले नाही. न्यूझीलंडविरुद्ध पाच विकेट घेणाऱ्या मोहम्मद शमीने या सामन्यातही घातपाताची गोलंदाजी करत चार विकेट्स आपल्या नावावर केल्या. अनुभवी जसप्रीत बुमराहने तीन बळी घेतले. कुलदीप यादवला दोन आणि रवींद्र जडेजाला एक यश मिळाले.
तत्पूर्वी, सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताच्या डावाची सुरूवात खराब झाली. भारताच्या तीन फलंदाज अवघ्या 40 धावांत बाद झाले. यामध्ये शुभमन गिल 9, विराट कोहली 0 आणि श्रेयस अय्यर 4 धावांवर बाद झाले. रोहित 87, केएल राहूल 39 आणि अखेरीस सुर्यकुमारने केलेल्या 49 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने 229 धावा केल्या. (ODI WC)
सामन्यात भारताने इंग्लंडला विजयासाठी 230 धावांचे लक्ष्य दिले आहे. टीम इंडियाने 50 षटकांत नऊ विकेट गमावून 229 धावा केल्या. भारतीय संघ असा एकमेव संघ आहे जो या विश्वचषकात आतापर्यंत ऑलआऊट झालेला नाही. भारताकडून रोहित शर्माने कर्णधारपदाची खेळी खेळली आणि 87 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने 49 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून डेव्हिड विलीने सर्वाधिक तीन बळी घेतले. (ODI WC)