कोल्हापूर, गौरव डोंगरे : थॅलेसेमियाग्रस्त बालकांमध्ये जन्मापासूनच हिमोग्लोबिनची निर्मिती होत नाही. या बालकांना प्रत्येकी 15 ते 21 दिवसांनी बाहेरील रक्त द्यावे लागते. सांगली, सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात रक्तदानाकडे दुर्लक्ष असल्याने असे अनेक रुग्ण कोल्हापुरातून रक्त घेऊन जाण्यासाठी येतात. कोल्हापूर जिल्ह्यात अशा रुग्णांची संख्या 300 घरात पोहोचली आहे.
भारतात वर्षाकाठी जवळपास 10 हजार बालके थॅलेसेमिया घेऊन जन्माला येतात. शासकीय रुग्णालयांकडे तपासणी होत नसल्याने तसेच योग्य जनजागृती अभावी हे प्रमाण वाढत चालले आहे. थॅलेसेमिया ही आनुवांशिक व्याधी आहे.
'थॅलेसेमिया मायनर' रुग्ण सर्वसाधारणपणे आपले जीवन जगत असतात. तसेच त्यांना कुठल्याही प्रकारची आजाराची लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे आपण 'थॅलेसेमिया मायनर'चे रुग्ण आहोत हे त्यांना कळतही नाही. त्यामुळे ज्यांना 'थॅलेसेमिया मायनर' हा आजार आहे, त्यांच्या मुलांमध्ये 'थॅलेसेमिया मेजर' या आजाराची लक्षणे दिसून येतात.
15 ते 21 दिवसांनी रक्तपुरवठा
बाळाचा जन्म झाल्यानंतर 4-6 महिन्यांमध्ये 'थॅलेसेमिया मेजर' या आजाराची लक्षणे दिसू लागतात. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे ही बालके अशक्त बनतात. अंग पिवळे पडू लागते. त्यांच्या लोहाची कमतरता दूर करण्यासाठी प्रत्येकी 15 ते 21 दिवसांनी बाहेरून रक्तपुरवठा करावा लागतो.
थॅलेसेमिया चाचणी आवश्यक
'थॅलेसेमिया मायनर' पीडित स्त्री-पुरुष यांच्यापासून जन्म घेणारे अपत्य 'थॅलेसेमिया मेजर'ने ग्रस्त असू शकते. याकरिता प्रत्येक व्यक्तीने विवाहपूर्व किंवा अपत्यासाठी इच्छुक असणार्यांनी थॅलेसेमिया मायनरची रक्त चाचणी करणे आवश्यक आहे.
आजाराची मुख्य लक्षणे
अशक्तपणा
हृदयाच्या समस्या
थकवा
शरीर पिवळे पडणे
अस्थी विकृती