पुढारी ऑनलाईन: Nuh Haryana Violence Updates : दक्षिण हरियाणातील नूह येथे विश्व हिंदू परिषदेची जलाभिषेक यात्रा रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर जमावाने मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळ केली. गेल्या पाच दिवसांपासून नूह शहरात तणाव कायम असून, येथील एसपी वरुण सिंगला यांची भिवानी येथे तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी नवीन एसपी म्हणून नरेंद्र बिजार्निया यांची नियुक्ती करण्यात आली, असे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
नूह हिंसाचारानंतर पोलिसांनी गोरक्षा बजरंग फोर्सचा अध्यक्ष बिट्टू बजरंगी उर्फ राजकुमार याच्यावर बुधवारी सारण पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. बिट्टूवर आठवडाभरात दाखल झालेला हा तिसरा गुन्हा आहे. विविध पोलीस ठाण्याचे पोलीस आरोपींच्या शोधात संभाव्य ठिकाणी छापे टाकत आहेत, दरम्यान बिट्टू बजरंगी विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून नूह हिंसाचार उसळला आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत किमान 176 लोकांना अटक करण्यात आली असून, 78 जणांना प्रतिबंधात्मक ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच नूहमधील 46, गुडगावमधील 23 आणि पलवलमधील 18 अशा पाच जिल्ह्यांमध्ये 93 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. शुक्रवारी नूह जिल्ह्यात मोबाईल इंटरनेट सेवाही तात्पुरती बंद करण्यात आली होती, असे टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
यापूर्वी, जिल्ह्यात कर्फ्यू लागू झाल्यानंतर निमलष्करी दलाने नूहमध्ये फ्लॅग मार्च काढला होता. एकीकडे नूहचे एसपी वरुण सिंगला यांची बदली करण्यात आली आहे तर दुसरीकडे, नूहमध्ये आज रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत दोन तासांसाठी कर्फ्यू शिथिल करण्यात येणार आहे. याशिवाय आज गुरुग्राममध्ये घरातूनच शुक्रवारची नमाज अदा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
गुरूग्राममध्ये या आठवड्यात जमावाने धुडगूस घातला आहे. दुकाने जाळणे, रस्त्यावरून फिरत दहशत निर्माण करणे आणि ठराविक समुदायाच्या सदस्यांना खुलेआम धमक्या दिल्याचे दृश्य याठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे येथील एका आयटी व्यावसायिकाने त्याच्या पाच जणांच्या कुटुंबासह दिल्ली शहरात स्थलांतर केले आहे. दरम्यान सोमवारी संध्याकाळी या कुटुंबाने आपले घर सोडले. त्यांचा घराच्या अगदी जवळ, सोहना येथे, जेथे धार्मिक यात्रेवर नूह हल्ल्याचा बदला म्हणून जमावाने दुकाने आणि घरांना लक्ष्य केले. त्यानंतर 'गेल्या 20 वर्षांत कधीही इतके असुरक्षित वाटले नाही, असे म्हणत रहिवाशांनी दु:ख व्यक्त केले आहे.