मुंबई : पुढारी वृत्तसेवा : वंदे भारत एक्सप्रेसमधील प्रवाशांनी केलेल्या सूचना आणि तक्रारींमुळे रेल्वे मंत्रालयाने पुढील सहा महिने वंदे भारत एक्सप्रेसमध्ये पॅकेज फूड न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रात धावणाऱ्या सीएसएमटी-शिर्डी, सोलापूर, मडगाव, मुंबई सेंट्रल – गांधीधाम आणि नागपूर – बिलासपूर मार्गावर पाच वंदे भारत एक्सप्रेसना प्रवाशांची पसंती मिळत आहे. परंतु तयार करून ठेवलेले खाद्यपदार्थ विकण्यासाठी कोचमध्ये विक्रेत्यांची गर्दी नको वाटते.
बेकरी उत्पादने, वेफर्स, मिठाईच्या वस्तू, कोल्ड ड्रिंक इत्यादी वस्तूंच्या विक्रीला परवानगी दिल्याने प्रवाशांच्या तक्रारी वाढल्याचे रेल्वे परिपत्रकात नमूद केले आहे. म्हणून या वस्तूंच्या विक्रीची परवानगी सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर बंद करण्यात आली आहे. प्रवाशांना ताजे पाणी मिळावे म्हणून रेल्वे मंत्रालयाने रेल नीरच्या बाटलीबंद पाण्याचा साठाही न करण्याचे निर्देश दिले आहेत.