उदयपूर; वृत्तसंस्था : साठ टक्के इथेनॉल आणि चाळीस टक्के वीज या दोन्हींची सरासरी एकत्र केली तर आगामी काळात पेट्रोलचा दर प्रतिलिटर पंधरा रुपये होऊ शकतो, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य केंद्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. ते राजस्थानातील प्रतापगड येथे बुधवारी एका जाहीर सभेत बोलत होते.
इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देणे हे आमच्या सरकारने धोरण आहे. त्यामुळे शेतकरी आता अन्नदाता नव्हे तर, ऊर्जादाता बनेल. येत्या ऑगस्टमध्ये टोयोटा कंपनी नव्या गाड्या लाँच करणार असून शेतकर्यांनी बनवलेल्या इथेनॉलवर त्या चालतील. यामुळे जनतेचे कल्याण होईल. प्रदूषणही मोठ्या प्रमाणावर घटेल. कच्च्या तेलाची आयात कमी होईल. आता तर विमानचे इंधनही शेतकरी तयार करत असून ही मोदी सरकारची कमाल आहे, असे त्यांनी नमूद केले. इंधनाच्या आयातीवर सध्या 16 लाख कोटींचा खर्च करावा लागत आहे. आता तो थेट शेतकर्यांच्या घरात जाणार आहे. पानिपतपासून परळीपर्यंत इथेनॉल तयार होत आहे.
रोजगारावर ते म्हणाले, देशात ऑटोमॉबाईल क्षेत्राची उलाढाल 7.5 लाख कोटी रुपये आहे. या क्षेत्राने पाच कोटी तरुणांना रोजगार दिला आहे. आता आम्ही या क्षेत्राला 15 लाख कोटींचे बनवण्याचा निर्धार केला असून त्याद्वारे 10 कोटी तरुणांना नोकरी मिळेल.