इंदापूर, पुढारी वृत्तसेवा: निरा डावा कालव्याला इंदापूर तालुक्यातील वरकुटे खुर्द हद्दीत मोठे भगदाड पडले असून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांसह शेततळ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान वरकुटे खुर्द पत्रेवस्ती या ठिकाणी निरा डावा कालव्याचा एक भरावा अचानक खचून त्यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे कालवा मोठ्या प्रमाणात खचू लागला आहे. वाहून जाणारे पाणी थेट शेतकऱ्यांच्या ढोबळी, मका, ऊस, डाळिंब आदी पिकांमध्ये गेले असून शेततळ्याचे मोठे नुकसान झाले आहे. अगोदरच सलग चार दिवस सुरू असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने नुकसान झाले होते. त्यात कालवा फुटल्याने आणखी भर पडून मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत जलसंपदा विभागाचे उपअभियंता रतन झगडे यांना विचारले असता ते म्हणाले, पावसामुळे कालवा पूर्ण क्षमतेने वाहत आहे. वरकुटे खुर्द हद्दीत कालव्याला भगदाड पडले असून ते बुजवण्यासाठी आम्ही कसून प्रयत्न करत आहोत. जेसीबीद्वारे कालवा दुरुस्ती करण्याचे कामकाज सुरू आहे. तसेच तातडीने 57 फाटा सुरू केला असून वरकुटे खुर्द तलावात देखील पाणी सोडले आहे. पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर तातडीने दुरुस्ती करण्याचे काम केले जाईल. जलसंपदा विभागाकडून पाण्याच्या स्त्रोत दुसरीकडे वळवण्याचा कसोशीने प्रयत्न सुरू आहेत.