नागपूर; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना भाजपने फोडली नाही, तर राष्ट्रवादीचा हा प्लान होता असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केला आहे. माध्यमांशी बोलत असताना त्यांनी हा आरोप केला आहे. 50 आमदार बाहेर गेले हे खोके बीके काही नाही, तर आमदारांच्या मनात भीती निर्माण झाली म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडले, भाजपने कुठेही षडयंत्र केले नाही, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली.
शिवसेना भाजपनेते अमित शहा यांनी फोडली नाही तर उद्धव ठाकरेंच्या पुत्रप्रेमापोटी अति महत्वाकांक्षी निर्णयाने फुटली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 50 आमदार बाहेर निघाले नसते तर त्यांना पुढच्या निवडणुकीत हरवण्याचा प्लान राष्ट्रवादीने केला होता. आता महाविकास आघाडी सरकार असते तर उद्धव ठाकरे यांचे 24 आमदार राहिले असते आणि राष्ट्रवादीचे 100 झाले असते. पुढच्या काळात सुप्रिया सुळे मुख्यमंत्री आणि आम्हाला हरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला. 50 आमदार बाहेर गेले हे खोके बीके काही नाही, त आमदारांच्या मनात भीती निर्माण झाली म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडले, भाजपने कुठेही षडयंत्र केले नाही. उद्या सोनिया गांधी, शरद पवार यांनी लोकसभेच्या दोन जागा दिल्या तरी उद्धव ठाकरे मविआतून बाहेर पडणार नाहीत, कारण त्यांच्यापुढे पर्यायच नाही असेही बावनकुळे म्हणाले.
कल्याणमध्ये गैरसमजातून तिथे काही स्थानिक प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर ठराव झाला हा काही महाराष्ट्राचा वाद नाही. भाजप- सेना युती ही घट्ट आहे, तिला कोणी तडा देऊ शकत नाही, श्रीकांत शिंदे यांना कोण हटविणार आहे, उलट आम्ही शक्ती देऊ अधिक मतांनी निवडून आणू, मी स्वतः रवींद्र चव्हाण यांच्याशी बोलणार आहे असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना केले. माझे एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्याशी बोलणे झाले आहे. मुळात कल्याण भाजप लढेल हा अधिकार स्थानिक कार्यकर्त्यांचा नाही, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल. कोणती सीट कोणाला मिळणार, कुठला उमेदवार कोण असणार हा निर्णय राज्य भाजपाचा अधिकार आहे. ना कल्याणच्या कार्यकर्त्यांचा अधिकार नाही, हा केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डला अधिकार आहे. त्यामुळे असे ठराव करून काही फार उपयोग होत नाही असेही स्पष्ट केले.