पुढारी ऑनलाईन डेस्क : सोमालियन चाच्यांनी अपहरण केलेल्या इराणी मासेमारी जहाजाची भारतीय नौदलाने सुखरूप सुटका केली आहे. भारतीय नौदलाची युद्धनौका INS सुमित्रा अपहरण झालेल्या जहाजाची सुटका करण्यासाठी कोचीच्या पश्चिमेला 700 नॉटिकल मैल अरबी समुद्रात आली होती.
एमव्ही इमान या इराणी मासेमारी जहाजाचे सोमालियन चाच्यांनी अपहरण केले होते. या जहाजावर सुमारे १७ क्रू मेंबर्स आहेत. भारतीय नौदलाने अशांत प्रदेशात पाळत ठेवली आहे. भारताकडे जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर नुकत्याच झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सुमारे 10 युद्धनौकांचा समावेश असलेले टास्क ग्रुप तैनात केले आहेत.
भारतीय नौदलाने संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून जहाज आपल्या ताब्यात घेतले आहे. भारतीय नौदलाच्या जवानांनी समुद्री चाच्यांना नि:शस्त्र केले आहे आणि त्यांना सोमालियाच्या दिशेने जाण्यास सांगितले आहे. एएनआयच्या माहितीनुसार, आयएनएस सुमित्रा आता धोक्याच्या क्षेत्रातून बाहेर गेली आहे. एका भारतीय संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले की, युद्धनौकेवर असलेल्या एएलएच ध्रुव हेलिकॉप्टरने जहाजावर उपस्थित चाच्यांना सावध करण्यासाठी अपहरण केलेल्या जहाजाला वेढा घातला होता.