पौराणिक कथांनुसार शुंभ-निशुंभ या दैत्यांनी देवांना पूर्णपणे प्रभावहीन केलं होतं. देवांनी स्वतःचं सामर्थ्य परत मिळविण्यासाठी हिमालय पर्वतावर जाऊन देवी भगवतीची प्रार्थना केली. तेव्हा भगवती म्हणजेच पार्वतीच्या देहातून कौशिकी ही सुंदर देवी निर्माण झाली. निशुंभाने तिला विवाहाची मागणी घातली. तेव्हा देवीने अट घातली की, माझ्यासह युद्ध करून जो जिंकेल, मला तोडीस तोड ठरेल, त्याच्याशी मी विवाह करेन. तेव्हा शुंभ-निशुंभ प्रचंड बळासह युद्धासाठी उतरले. त्यांचा पराभव करण्यासाठी कौशिकी देवीची अंगभूत शक्ती चंडिका प्रगटली. तिने रक्तबीजाला नेस्तनाबूत करून शुंभ-निशुंभांना पराभूत केले. त्या चंडिका शक्तीलाच महासरस्वती म्हटलं जातं. भारतात विविध ठिकाणी महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती, अशा तिन्ही मूर्ती एकाच पीठावर स्थापन केलेल्या पाहायला मिळतात.