नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा
मुंबई आग्रा महामार्गाने मुंबईकडे डाळीचा ट्रक घेऊन जाणाऱ्या अकबर शहा मेहबूब शहा (५३, रा. खैर मोहम्मद मदिना चौक, अकोला) या ट्रकचालकाचा मालेगावजवळील एका हॉटेलवर जेवणासाठी थांबलेला असताना मृत्यू झाला. उष्माघातामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
अकबर शहा हा मुंबईकडे जात असताना त्याने हॉटेल संयोगजवळ ट्रक थांबवला. येथे क्लीनरसह तो जेवणासाठी बसला होता. यावेळी त्याला अस्वस्थ जाणवू लागल्याचे क्लीनरला सांगितले. क्लीनरने हॉटेलमालकाला या संदर्भात सांगितले असता त्यांनी चाळीसगाव फाट्यावरील रुग्णवाहिका तातडीने बोलावली. रुग्णवाहिका चालक राहुल पाटील यांनी अकबर शहा यांना सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. मालेगाव परिसरातील उष्णतेची लाट त्यांना असह्य झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.