नाशिक : पुढारी वृत्तसेवा–रिक्षात विसरलेले दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग प्रवाशास परत करणाऱ्या प्रामाणिक रिक्षाचालकाचा सत्कार करीत सातपूर पोलिसांनी कौतुक केले. श्रीकांत हिरे असे या रिक्षाचालकाचे नाव असून, त्यांनी आपल्या प्रामाणिकपणातून रिक्षाचालकांची प्रतिमा उंचावली आहे.
शहरात अनेकदा काही रिक्षाचालकांच्या अरेरावी किंवा अवास्तव रिक्षाभाडेमुळे प्रवाशांशी वाद होत असतात. नागरिकांना अनेकदा बेशिस्त रिक्षाचालकांचा अनुभव येतो. मात्र सुजाता देसले (रा. अशोकनगर, सातपूर) यांना प्रामाणिक रिक्षाचालकाचा अनुभव आला. त्या रविवारी (दि. १७) ठक्कर बाजार ते सातपूर असा एमएच १५ जेए २४७२ क्रमांकाच्या रिक्षाने प्रवास करीत होत्या. रिक्षातून उतरल्यानंतर काही वेळाने बॅग नसल्याचे सुजाता यांच्या लक्षात आले. बॅगेमध्ये महत्त्वाची कागदपत्रे आणि सोन्याचे दागिने होते. त्यांनी रिक्षाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र रिक्षा आढळली नाही. त्यामुळे त्यांनी अशोकनगर पोलिस चौकीत बॅग विसरल्याची तक्रार दिली होती. पोलिस अंमलदार सागर गुंजाळ यांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. मात्र रिक्षा क्रमांक मिळाला नसल्यामुळे तपास रखडला होता. सोमवारी (दि. १८) सुजाता यांनी रिक्षाचालकाचा तपास केला असता, संबंधित रिक्षाचालकच त्यांच्यासमोर आला व त्यांनी सुजाता यांना बॅग परत केली. ही बाब सातपूरचे पोलिस निरीक्षक पंकज भालेराव यांना समजताच रिक्षाचालक श्रीकांत हिरे यांना बोलावून घेत त्याचा सत्कार केला.
हेही वाचा :